कोची-भारतीय यंत्रणांनी समुद्रात महत्वपूर्ण कारवाई करताना लक्षद्वीप किनाऱ्यालगत आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीला पकडले. त्या टोळीकडून हेरॉईन या अंमली पदार्थाचा 218 किलो साठा जप्त करण्यात आला. त्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजरातील किंमत तब्बल 1 हजार 500 कोटी रूपये इतकी आहे.
संबंधित कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने केली. तामीळनाडू किनाऱ्यावरून निघालेल्या दोन भारतीय नौकांमध्ये अरबी समुद्रात अंमली पदार्थांचा साठा उतरवला जाणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ती घडामोड घडेल, अशी माहिती डीआरआयला काही महिन्यांपूर्वी मिळाली. त्याआधारे डीआरआय आणि तटरक्षक दलाने ऑपरेशन खोजबीन या नावाने 7 मेपासून विशेष मोहीम हाती घेतली.
तटरक्षक दलाच्या जहाजाने शोधकार्य सुरू केले. त्या मोहिमेवेळी दोन संशयास्पद नौका भारताच्या किनाऱ्याकडे येताना आढळल्या. त्या नौका 18 मे यादिवशी लक्षद्वीप किनाऱ्याजवळ रोखण्यात आल्या. त्या नौकांमधील तस्करांनी हेरॉईन साठा घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्या नौका कोची किनाऱ्यावर आणण्यात आल्या. तिथे नौकांमधील हेरॉईन साठा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या तस्करांची आता विविध यंत्रणा कसून चौकशी करणार आहेत.