-मागील दहा दिवसांपासून मावळात पाऊस गायब
-खाचरे कोरडी पडली; लागवडीही खोळंबल्या
-उत्पादकांना चिंता : पाण्याअभावी भात
-रोपांनी मान टाकली
कामशेत – मावळ तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीच्या काळात पडलेल्या पावसावर ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या.त्या लागवडी आता पाण्या अभावी सुकू लागल्याने “येरे येरे पावसा…’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मावळात मागील आठवड्या भरापासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी भात लागवडी खोळंबल्या आहेत, तर झालेल्या लागवडी पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत.
या वर्षी मावळात उशिरा म्हणजेच 10 जुलैला मॉन्सूनचे आगमन झाले. आगमन झाल्यापासून पुढील 10 दिवस देखील नियमितपणे पाऊस न पडल्याने दरवर्षी पाण्यानी तुडूंब भरून वाहणारी भात खाचरे आता कोरडी पडली आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांना भात लागवड करता येत नसल्याने भात लागवडी देखील खोळंबल्या आहेत.
तालुक्यात दरवर्षी सरासरी बाराशे ते चार हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील शेतकरी भाताचे पीक घेतात. पावसाचा भाग असल्याने या पिकाची समाधानकारक वाढ होते. या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने मावळात भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुढील काही दिवस पाऊस लांबला, तर पाऊस पडण्याची शक्यता कमी होईल. पहिल्या पावसात झालेल्या लागवडी व सर्वत्र उगविलेला हिरवा चारा देखील सुकू लागला आहे. मावळातील धरणे देखील 45 ते 50 टक्केच भरलेली असल्याने पाण्याच्या टंचाईस लोकांना सामोरे जावे लागेल, यामुळे शेतीसाठी पाणी मिळते की नाही याची देखील चिंता निर्माण होत आहे.
पावसाच्या अनियमित पणामुळे भातपीक संकटात येऊ शकते. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा उतरवून आपले पीक संरक्षित करणे आवश्यक आहे. पीक विम्याची मुदत 24 जुलैपर्यंत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा काढलेला नाही, त्यांनी तत्काळ पीक विमा काढून घ्यावा.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.