बहुतांश आजारांवर रामबाण उपाय करणारेच झाले घरात लॉक
पिंपळे निलख – पिंपरी-चिंचवड शहरात तसेच उपनगरांमध्ये रहदारीच्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या पदपथावर जडीबुटीची दुकाने थाटून बसलेले वैद्य करोनाकाळात गायब झालेले दिसून येत आहेत. सध्या शहरातील बहुतांश शाही वैद्यांच्या केवळ झोपड्या दिसून येत आहेत. परंतु वैद्य करोनामुळे लॉक झाले आहेत. सर्व आजारांवर रामबाण उपाय करणार अशी ख्याती मिरविणारे वैद्यच करोनाच्या भीतीने घरात बसले आहेत. त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून उपासमारीची वेळ आली आहे.
पिंपळे निलख, आकुर्डी खंडोबामाळ, कासारवाडी आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला तंबू व आपली जुनी पुरानी गाडी उभी करून ध्वनिक्षेपक लावून विविध आजारांवर जडी बुटी देणारे वैद्य करोना महामारी सुरू झाल्यापासून शहरातून गायब झाले आहेत. त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी कोणी येत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. तर काहींनी आपला बारीबस्तारा गुंडाळून ठेवला आहे.
शहरातील अनेक ठिकाणी काही वैद्य मंडप व जुन्या काळातील वाहने घेऊन आपला आयुर्वेदिक दवाखाना चालवत होते. पिंपळे निलख परिसरातही काही ठिकाणी असे जडी बुटी व शाही वैद्य म्हणवून घेणारे तंबू दिसून येत आहेत. परंतु गेल्या वर्षभरापासून करोना आजाराने थैमान घातले आहे. यावर मात करण्यासाठी वैद्यकीय विभाग व डॉक्टर व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी सेवा देत आहेत. परंतु स्वतः खूप मोठा हिमालयातील वैद्य म्हणवून घेणारी मंडळी मात्र आज शहरातून गायब झाली आहे. कोणत्याही अजारावर हिमालयातून जडीबुटी आणून देता तुमचा अजार बरा करतो अशी ग्वाही देणारे वैद्य नेमके गेले कुठे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
नागरिकांची होते फसवणूक
रस्त्यावर कोणत्याही प्रकारची शास्वती, भरवसा व खात्री नसणाऱ्या या शाही आयुर्वेद म्हणवणाऱ्या अनोळखी माणसांकडून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे अनेक आहेत. तसेच स्वतः वैद्य म्हणून घेणारे हिमालयातून औषध आणतो त्यासाठी एवढे पैसे लागतील असे सांगून पैसे गोळा करून नागरिकांना गंडा घालत आहेत. अशा भोंदू लोकांकडून आजार बरे होत नसून केवळ आर्थिक फसवणूक होत आहे.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
महिनोंमहिने हे जुडीबुटीवाले रस्त्याच्या पदपथावर तंबू ठोकून राहतात. परंतु त्यांच्याकडे वैद्य असल्याचे प्रमाणपत्र अथवा कागदपत्रांची कोणतीही चौकशी पोलीस प्रशासन करत नाही. लोकांची फसवणूक झाल्यानंतर त्याचा शोध सुरू होतो. त्यामुळे पोलीस प्रशासन व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने असे पदपथावर दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.