अहमदाबाद – पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26/11 च्या हल्ल्यावेळी हत्या केलेल्या तीन मच्छिमारांच्या कुटुंबियांना गुजरात सरकारने तब्बल 12 वर्षांनी नुकसानभरपाई दिली. प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
अन्य दोन मच्छिमारांना यापुर्वी अन्य यंत्रणांकडून यापुर्वी नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यात कुबेर बोटीचे कॅप्टन अमरसिंह सोळंकी यांचा समावेश आहे. या मच्छिमार बोटीवर हल्ला करून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्याच बोटीतून मुंबई गाठली होती. गुजरातच्या नवासरी जिल्ह्यातील जलालपोर तालुक्यात वांसी गावातील नातू राठोड, मुकेश राठोड आणि बलवंत तांडेल यांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात आली.
पाच लाख रुपयांच्या मुदतठेवी या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आल्या. मरण पावलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबियांकडे त्याची कागदपत्रे शुक्रवारी सोपवण्यात आली, असे मामलेदार रोशनी पटेल यांनी सांगितले. सरकारी नियमांप्रमाणे या मुदतठेवींची मुदत तीन वर्षांची आहे. या मच्छिमार मरण पावल्याचे 2017 मध्ये नवासरी दिवाणी न्यायलयाने मृत जाहीर केले होते. त्यांना मृत घोषित करेपर्यंत त्यांना मदत देता येत नव्हती.