सातारा – सातारा जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे 11 तालुक्यापैकी 8 तालुक्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापैकी कराड व पाटण तालुक्यामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेली चार दिवस अनेक गावे पुराच्या विळख्यात आहेत. त्यामुळे लोकांना मदतीची गरज होती. याचे गांभीर्य ओळखूनच वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ जिल्हा सातारा यांच्यावतीने मदत म्हणून 90 किलो तांदुळ रामहारी भोसले तहसीलदार पाटण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.
यावेळी पूरग्रस्तांच्या अडीअडचणींची माहिती घेतली व सर्व पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व मदत तातडीने मिळावी. तसेच सर्व शाळांच्या इमारतींचे ऑडिट करावे व पावसामुळे रोजंदारावर काम करणाऱ्यांना सुद्धा रोजगार नसल्याने त्यांचावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत त्यांनाही अन्न धान्य स्वस्थ दरात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच अजुनही काही मदत लागल्यास सुचना करावी अशीही विनंती तहसीलदार पाटण यांना कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी कराड तालुक्यात महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनचालकांना बिस्कीट पुडे व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव सचिन माळी, जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत, भरत लोकरे सर, बाळकृष्ण देसाई, विशाल भोसले, आदिनाथ बिराजे, प्रमोद क्षिरसागर, अशोकराव देवकांत, सर्जेराव सावंत, ऋषिकेश कांबळे उपस्थित होते.