नवी दिल्ली – अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांबरोबर शुक्रवारी चर्चा केली. ओमायक्रॉनमुळे विविध क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे आणि त्यांना बॅंकाकडून कशी मदत करता येईल या संदर्भातील आढावा या बैठकीत घेण्यात आला.
ज्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे त्या क्षेत्रांना मदत करा अशी सूचना त्यांनी केली. ज्या क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये शेती, रिटेल, छोटे उद्योग, इत्यादींचा समावेश आहे. अजून तरी या क्षेत्रावर फारसा गंभीर परिणाम झालेला नाही. मात्र आगामी काळात काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
गेल्या वर्षी लॉकडाउनवेळी विविध क्षेत्रांना रिझर्व बॅंक आणि अर्थ मंत्रालयाने काही सवलती जाहीर केल्या होत्या. तशा प्रकारच्या सवलती आणखी तरी जाहीर झालेल्या नाहीत. मात्र जर परिस्थिती बिघडली तर त्या शक्यतेवर विचार करावा लागणार आहे. चौथ्या तिमाहीतील विकास दरावर परिणाम होणार असल्याचे भाकित बऱ्याच पतमानांकन संस्थांनी केले आहे. या संदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला. कर्ज पुरवठा वाढावा यासाठी अर्थमंत्रालय प्रयत्न करीत असून दोन महिन्यांपूर्वी बॅंकांनी 61 हजार कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे.
एलआयसीच्या आयपीओचा आढावा
एप्रिल महिन्याअगोदर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारावर नोंदला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील तयारी जोरात चालू आहे. या तयारीचा आढावा अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घेतला. या बैठकीमध्ये एलआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर अर्थ मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी निर्गुंतवणुकीतून सरकारला 1.75 लाख कोटी रुपये अपेक्षित आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 9,330 कोटी रुपये जमा झाले आहेत.