पुणे – केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर वजनदार मंत्री आहेत, त्यांनी पुण्यातील करोना साथ नियंत्रणासाठी भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती, ते कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागताहेत. हे ढोंगी राजकारण आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.
राज्य सरकारची कोंडी करून अपयशी ठरविण्याचा डाव भाजप नेत्यांचा आहे. केंद्रीय मंत्री जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची वक्तव्ये हा त्याचाच भाग आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे रहिवासी आहेत. पुण्यात भाजपचे खासदार, चार आमदार, शंभर नगरसेवक आहेत. यांच्यामार्फत जावडेकर यांनी पुण्यात यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायला हवी होती.
केंद्र सरकारमार्फत ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर अशा सुविधा पुरवायला हव्या होत्या. देशाचा विचार केला तर करोनाचे थैमान पुण्यात सर्वाधिक आहे, याचे गांभीर्य ओळखून केंद्राकडून अधिकाधिक पुरवठा होईल याची दक्षता जावडेकर यांनी घ्यायला हवी होती.
पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडून जावडेकर यांनी शहरातील व्यवस्थेची माहिती घ्यायला हवी होती. हे न करता राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी जावडेकर करतात यामागे कुटील डाव आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.
भाजपचे स्थानिक नेते, खासदार, आमदार यांनी आरोप प्रत्यारोप न करता साथ नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.