पुणे -कोल्हापूर व सांगली येथील पूरपरिस्थिती निवळत आहे. सध्या सांगली येथे नदी पातळी धोका पातळीच्या केवळ 4 इंच, तर कोल्हापूरमध्ये धोका पातळीच्या 1 फूट 11 इंचावरून वाहत आहे. सध्या धरणक्षेत्रात पाऊस सामान्य असल्याने ही पूर पातळी झपाट्याने उतरणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पुढच्या काही तासांत सामान्य होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
विधानभवन येथे विभागीय आयुक्त यांनी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. धरणक्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा असला, तरी पर्जन्यमान सामान्य आहे. पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचे व सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. काही भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.
विभागात 48 जणांचा मृत्यू
पुणे विभागात 48 जणांचा मृत्यू झाला असून यात सांगली-21, कोल्हापूर-10, सातारा व पुणे- प्रत्येकी 7, तर सोलापूर जिल्ह्यातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1, 448 घरांची अंशत: पडझड झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 236 घरांची अंशतः 268 घरांची पूर्णतः तर 313 गोठ्यांची पडझड झाली आहे.
सध्या पूरस्थिती सामान्य होत असून सानुग्रह अनुदान व पाच हजार रोख रक्कम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात सुरुवात केली आहे. उर्वरित ठिकाणी ही रक्कम देण्यात येणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बॅंकिंग सेवाही पूर्ववत होत आहेत. सर्व बॅंकेत व एटीएममध्ये आवश्यक रकमेचा भरणा करण्यात आला आहे.
– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त
धरणांत आवक आणि विसर्ग (क्युसेक)
कोयना – 25,287 – 27,265
अलमट्टी – 6,11,970 – 5,70,000