पेठ (प्रतिनिधी) – कोल्हारवाडी (ता.आंबेगाव) येथे सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. या विवाह प्रसंगी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
कोल्हारवाडी येथील अजित तोत्रे आणि पारगाव (पेठ ) येथील अक्षदा सावंत यांचा विवाह निश्चित झाला होता. लॉकडाऊनमुळे ठरलेला विवाह पुढे ढकलण्यात आला. परंतु दिवसेंदिवस करोना विषाणूच्या रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढवला जात होता. ही बाब ओळखून सातगाव पठार भागातील तोत्रे आणि सावंत कुटुंबाने लॉकडाऊन मध्येच विवाह करण्याचे ठरवले. त्यानुसार मंचर पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन विवाह निश्चित करण्याचे ठरवले.
याप्रसंगी दोन्ही कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. यानिमित्ताने मोजके लोक जरी उपस्थित होते. तरी प्रत्येक उपस्थित व्यक्तीला सॅनिटायझर मास्क याचे वाटप करण्यात आले. कोल्हारवाडी येथील तोत्रे यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या मध्यम असली तरी करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा हजार रुपयांचा धनादेश सातगाव पठार बीट पोलीस अंमलदार कैलास कड यांच्याकडे सुपूर्त केला. याप्रसंगी दोन्ही कुटुंबाची फार मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली. हा विवाह संपन्न करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे जनसंपर्क प्रमुख जयसिंगराव एरंडे, दत्तू एरंडे, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ नवले पाटील यांनी मोठा पुढाकार घेतला होता.