येरवडा – सांगली, कोल्हापूर येथे ओढवलेल्या पुरानंतर सांगली आणि कोल्हापूरवासियांसाठी सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटल येथील लक्ष्मी मेडिकलने पूरग्रस्तांना मदत देता यावी. यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर औषधे देत उपलब्ध करून दिली आहेत.
अनुप जाधव, वैभव कुलकर्णी, अक्षय पांढरे यांनीही वाढदिवसावर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी मदत दिली. कस्तुरबा सोसायटी येथील वारसा फाउंडेशन व शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, पुणे यांचे आवाहनाला प्रतिसाद देत प्रभाग क्र. 3 व 42 मधील आरोग्य कोठीतील सफाई सेवकांनी मदत गोळा करून प्रतिष्ठानकडे सुपूर्त केली. सफाई सेवक, आरोग्य निरीक्षक ललीता तमनर व मुकादम गायकवाड यांनी ही मदत गोळा केली. अष्टविनायक मंडळाच्या वतीनेही पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात येऊन ही मदत आपत्ती निवारण केंद्रात देण्यात आली.
यावेळी रोहन कोद्रे, विवेक ओव्हाळ, प्रथम बोकील, राहुल गाढवे, सनी मडके आदी कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. टिंगरेनगर येथील डॉ. निजानंद खामकर व त्यांच्याटीमनेही जवळपास पाच हजार जणांसाठी औषधे उपलब्ध करून दिली. विश्रांत सोसायटीमधील व्हीपीएस ग्रुपनेही खारीचा वाटा उचलला. वडगावशेरी येथील पन्नास ते साठ युवकांनीही मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू, पाणी बॉटल, औषधे आदी वस्तू गोळा करून त्या सांगलीला पोच केल्या आहेत.