मुंबई – आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाला चिन्ह दिले आहे. या पक्षाला चार राज्यांसाठी कपबशी तर एका राज्यासाठी हेलिकॉप्टर चिन्ह देण्यात आले आहे.
तामिळनाडू, पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी या सर्व राज्यांमध्ये निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या चार राज्यांमध्ये कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे. तर तामिळनाडूसाठी हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आले आहे.
दरम्यान, या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष चांगला प्रचार करून यश मिळवेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच तामिळनाडूतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना एकच निवडणूक चिन्ह मिळाल्याने तामिळनाडूत ही रिपब्लिकन पक्ष चांगली कामगिरी करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.