विक्रम कुंभार
हेळगाव (वार्ताहर) – संपूर्ण जग करोनासारख्या महाभयंकर संकटाला मोठ्या धैर्याने सामोरे जात आहे. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेळगावच्या सूर्यवंशी परिवारानेही याकाळात शाळा आणि परिसर स्वच्छ करून सर्व गावाचे मन जिंकले आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये मुंबई-पुणेमधील रहिवाशी लोकांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी काही अटी आणि शर्तीवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही नियमांचे पालन करून गाव पातळीवर वेगवेगळे निर्णय घेऊन या येणाऱ्या लोकांना वास्तव्यास ठेवले जात आहे. हेळगाव गावातही नियमांना अधीन राहून प्रत्येकाने आपल्या घरातच क्वारंटाइन होण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आहे. ज्यांच्या घरात त्या पद्धतीने सोयी सुविधा नसतील तर त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात येत आहे.
मानखुर्द (मुंबई) वरून आपल्या परिवारासह आलेले कृष्णत सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा सूर्यवंशी व मुलगा चिरंजीव कुणाल सूर्यवंशी हे तिघे हेळगाव येथे दि. 19 रोजी दाखल झाले. घरातच त्यांची क्वारंटाइन होण्याची व्यवस्था असतानाही या परिवाराने शाळेत 14 दिवस राहण्याचा निर्णय घेतला.
गेली कित्येक दिवस करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा पूर्णपणे बंद आहेत. यामुळे शाळेच्या आवारात व व्हरांड्यात खूप मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. हे पाहताच या परिवाराने मिळेल तेवढा वेळ साफसफाई करण्यात घालवला. ग्रामपंचायतीकडून खुरपे, खोरे या साहित्याची त्यांनी मागणी केली. संपूर्ण पटांगण, बगिचा, व्हरांड्याची साफसफाई त्यांनी केली. गेली कित्येक दिवस शाळा बंद असतानाही सध्या शाळेची अवस्था सुरू असल्याप्रमाणे स्वच्छ दिसत आहे. त्यामुळे गावातील लोकांनाही समाधान वाटू लागले आहे. सूर्यवंशी परिवाराचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
लहानपणी ज्या शाळेत शिकलो, खेळलो त्या शाळेची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. आपणही जीवनात शाळेचे तसेच गावाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे या दिवसात आपले दैनंदिन काम सोडले तर राहिलेल्या वेळेत ही सेवा घडल्याचा आनंद मिळाला.
कृष्णत सूर्यवंशी, हेळगाव