वाई – वाईमध्ये कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी गर्डर बसविले आहेत. यापूर्वी वाई पालिकेने अशाच पद्धतीचे अडथळे बसविले होते. काही विघ्नसंतोषी लोकांनी दोन्ही बाजूचे अडथळे जाणीवपूर्वक पाडले होते.
पोलिसांनी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट पोलीस पाहत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वाईकरांनी केली आहे.
या पुलावरून अवजड वाहनांना बंदी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी पोलीस व वाई पालिकेला निवेदनाद्वारे दिला होता. त्यामुळे पालिकेने दोन दिवसांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूंना नवीन अडथळे बसवून अवजड वाहनांची पुलावरून वाहतूक होऊ नये, याची दक्षता घेतली आहे.
या पुलाला तब्बल सव्वाशे वर्षे झाल्याने तो वाहतुकीस धोकादायक बनला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीत कृष्णा नदीला महापूर आल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूंना गर्डर बसवून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. महाडमध्ये सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.