मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी (30 ऑगस्ट) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तर सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. या पावसाने औरंगाबादमध्ये पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीय, तर चाळीसगावात पूर आलाय.
मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”