मुंबई- हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनंतर आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात जोरदार पाऊस झाला. दादर, माटुंगा,वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरी या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सायन, हिंदमाता, वरळी नाका परिसर जलमय झाला आहे.
मुंलुड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे या परिसरात पावसाचा जोर अधिक दिसून आला. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक व दैनंदिन जीवनावर विशेष परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आहे. सकाळपासून आलेल्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या लोकांवर या पावसाचा फटका बसला.
दरम्यान, पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई वेधशाळेने जिल्हा प्रशासनाला ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून देखील सर्वसामान्य नागरिकांना ट्विट करून घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.