सातारा -पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्याच्या खटाव, कोरेगाव, माण तालुक्याला रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम व पूर्व भागात परतीच्या पावसाची गुरुवारी दिवसभर रिमझिम सुरु होती.
या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येत्या 48 तासांत हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दक्षिण उपसागराच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र, कर्नाटक ते महाराष्ट्र असा प्रवेश होण्याचा अंदाज असल्याने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाच्या शक्यतेने यंत्रणा सतर्क झाली आहे.
रात्री झालेल्या पावसामुळे विविध गावांमध्ये शेतीतील पिकासह रस्ते, पूल, इमारतींचे नुकसान झाले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण व खटाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माणगंगा व येरळा या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये तसेच दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. म्हसवड, वडूज या गावांत नदीकाठच्या भागात पाणी शिरले. ठिकठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले.
अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. फलटण तालुक्यातील पालखी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. कराड तालुक्यातही पावसाचा मोठा फटका बसला. कराड- विटा व कराड -तासगाव या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. महामार्गावरील सेवा रस्त्यांवर पाणी साचले होते.
कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. धोम व कण्हेर धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा व वेण्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 83.24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला एका दिवसात 122.75 तर दुष्काळी माण तालुक्यात 84 मिलिमीटर व खटाव तालुक्यात 84.17 मिलिमीटर, फलटण 94.33, खंडाळा 92.92, कोरेगाव 57.85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याशिवाय सातारा तालुका 83.85, जावळी 68.12, पाटण 69.64, कराड 100. 69, वाई 72. 43 मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातून सकाळी 34211 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. सायंकाळी हा पाण्याचा विसर्ग कमी करून 15680 क्यूसेक करण्यात आला. सध्या धरणात 104.49 टीएमसी पाणीसाठा आहे. कण्हेर, धोम, उरमोडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून वेण्णा, उरमोडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उरमोडी धरणातून 1900 तर धोम धरणातून 423 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, गेल्या तीन दिवसाच्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांन