मुंबई : मुंबईसह उपनगरात बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. पावसाने मुंबई, ठाण्यात पूर्णपणे गोंधळ उडवला आहे. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचे पाहायला मिळाले.
पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळाले.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
दोन दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते कोविड सेंटरचे उद्धाटन करण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे या कोविड सेंटरमध्येही पाणी शिरल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी अद्याप जास्त सामान नसल्याने मोठे नुकासन टळले असून दुसरीकडे मुंबईतील जेजे रुग्णालयातही तळमजल्यात पाणी शिरले होते.