मुंबई – राज्यात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यानंतर आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. लातूर आणि उस्मानाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.