नवी दिल्ली – पाण्याने भरलेले तंबू, भीजलेले सरपण आणि पांघरूणे… रात्रीपासून पाऊस पडत असल्याने दिल्ल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रविवारची सकाळ थंडीला तोंड देण्यात अडचणीची गेली. निदर्शकांच्या जागेवर पाणी साचलल्याने वॉटरप्रूफ तंबूही फारसे उपयुक्त ठरू शकले नाहीत.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते अभिमन्यू कोहर म्हणाले, शेतकऱ्यांकडे वॉटरप्रूफ तंबू होते. मात्र, ते थंडी आणि पावसापासून त्यांचे रक्षण करू शकले नाहीत. पाणी जमा झाल्याने निदर्शनाच्या स्थळावर अत्यंत वाईट परिस्थिती होती. पावसानंतर थंडी कडाक्याची पडली. पण, आमचे हाल बघायला सरकारला वेळ नाही.
सिंघू सीमेवर तळ ठोकून बसलेल्या गुरविंदरसिंग यांनी सांगितले की, पुरेशा नागरी सुविधा नसल्याने पावसाच्या पाण्याने अडचणी आल्या. पण, निसर्गही आमचा निर्धार मोडू शकत नाही. कितीही अडचणी आल्या, अडथळे आले तरी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही येथून हालणार नाही.
हवामान खात्याने सांगितले की दिल्ली आणि परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र वातावरण ढगाळ असल्याने तापमानात काही प्रमाणात वाढ झाली. सफदरगंज केंद्रावर तापमान 9.9 अंश नोंदवले गेले. तर 25 मीमी पावसाची नोंद झाली. जानेवारी सहा पर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर महीन्यापेक्षा अधिक काळ हजारो शेतकरी तळ ठोकून आहेत. मात्र शेतकऱ्यांनी थंडीसाठी केलेल्या उपाय योजना अचानक आलेल्या पावसापुढे तग धरू शकल्या नाहीत. बुरारी मैदानावरही पाणीच पाणी झाले. आंदोलक ते पाणी काढून टाकण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र येथे पहायला मिळाले. पावसात सामान भीजू नये म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच प्रयत्न ते करत होते.
अफाट पावसामुळे आमचे कपडे ओले झालेत. सरपणात पाणी शिरल्याने अन्न शिजवणेही कठीण झाले आहे. आमच्याकडे एलपीजी सिलिंडर आहे. पण, येथील प्रत्येकाकडे तो नाही.
– वीरपालसिंग
आंदोलक शेतकरी