पुणे – खडकवासला धरणसाखळीत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला असला, तरी पुन्हा धरणसाठा वाढण्यास सुरूवात झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी 5 वाजता या चारही धरणांचा पाणीसाठा 14.84 टीएमसीवर पोहचला आहे. गेल्या 24 तासांत खडकवासला धरणात 8 मिमी, पानशेत धरणात 16 मिमी, वरसगाव धरणात 15 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चारही धरणांमधे गेल्या चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. त्यामुळे पाणीसाठ्यातील वाढही थांबलेली होती. मात्र, गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने तसेच पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या ओढे तसेच इतर जलस्रोतांमुळे पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत सुमारे अर्धा टीएमसी पाणी वाढल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.