अकोले – वाट पहायला लावणाऱ्या पावसाने आज भंडारदरा धरणाच्या पाणलोटात चांगली हजेरी लावली. या पावसामुळे सुकणाऱ्या भात पिकांना जीवदान मिळाले आहे. तर लांबलेली आवणीची कामे सुरू होण्याची शक्यता या पावसामुळे निर्माण झालेली आहे. रतनवाडी व पांजरे येथे चार इंच पावसाची नोंद झालेली आहे.
भंडारदरा धरणामध्ये बऱ्यापैकी पाणीवाढ झाल्याने धरणाचा साठा पाच हजार 796 दशलक्ष घनफूट म्हणजे 52.59 टक्के इतका झाला आहे. तर निळवंडे धरणाचा चार हजार 245 दशलक्ष घनफूट म्हणजेच 51.02 टक्के झालेला आहे. तर मुळा धरणात 12 हजार 283 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून तो 47. 24 टक्के इतका आहे. तर आढळा धरणामध्ये 470 दशलक्ष घनफूट इतका साठा झाला आहे.
तो 44.34 टक्के आहे. भोजापूर धरणांमध्ये 146 दलघफू पाणीसाठा झाला असून तो 40.44 टक्के इतका आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 67.41 टीएमसी आहे. तो पाणीसाठा 65.91 टक्के आहे.
धरणांमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये झालेली पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर- 110, रतनवाडी -104, पांजरे -98, वाकी-55, भंडारदरा -81, निळवंडे-12, आढळ -01, कोतूळ -03. या पावसाने धरणाच्या पाणलोटात सर्वदूर हजेरी लावल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.