नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. 2-3 दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोकणात आणि गोव्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे.
मध्य प्रेदश आणि गुजरात या राज्यांमधील काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे. उत्तरप्रदेश आणि राजस्थानचा पूर्व भाग, उत्तराखंड आणि अंदमान-निकोबारच्या किनारपट्टीवर पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारताच्या सागरी किनारपट्टीवरील पूर्व आणि मध्य भाग, गुजरातचा दक्षिणेकडील भाग आणि महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जोरदार वाऱ्यांसह पावसाची हजेरी राहणार आहे. त्यामुळे या सर्व भागातील किनारपट्टीवर मासेमारीसाठी मच्छिमारांनी जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.