– तब्बल 60 ठिकाणी झाडपडीच्या घटना, मोठे नुकसान
– मुख्य रस्त्यांवर ओहोळ, वाहने वाहून गेली
– पेठांसह कोथरूड, कात्रज, सिंहगड रस्ता पाण्याखाली
– पीएमपीच्या सर्व्हिस बसवर झाड कोसळले
पुणे – शहराच्या विविध भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या धुवांधार पावसामुळे नागरिकांनी दैना उडाली. तब्बल पाऊण तास वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळत होता. या पावसामुळे साठहून अधिक झाडपडीच्या घटना घडल्या, तर पाणी शिरल्याच्या दोन ते तीन घटनांची नोंद झाली आहे. पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस थांबला, तरी ही कोंडी फुटली नव्हती.
बुधवारी दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर पडत होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अगदी काही क्षणांत रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. मध्यवस्तीत तर पाऊस कोसळत होताच, त्याचबरोबर कोथरुड, कात्रज, सिंहगड रस्ता पाण्याखाली गेला. टिळक रस्ता, शिवाजी रस्ता याठिकाणी रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. त्यामुळे काही दुकानांमध्ये पाणी शिरले. स.प.महाविद्यालय चौकात पीएमपी बसवर झाड कोसळले. वाहन दुरुस्ती बसमधील काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापती, तर वाहनचालक जखमी झाला आहे.
कोथरुड, कर्वेनगर, वारजेमधील रस्ते जलमय झाले होते. कोथरुडमध्ये कर्वे पुतळा परिसरात रस्त्याच्या कडेने 3 फुटापर्यंत पाणी साठले. यात रस्त्याकडेच्या दुचाकी बुडाल्या. कोथरुड पोस्ट ऑफिससमोर तळे साचले होते. मेट्रो कामामुळे कर्वे व पौड रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी रस्ता अरुंद झालेला आहे. कामाच्या कडेने लावलेले लोखंडी पत्रे व पदपथ यामध्ये पाणी साठल्याने त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ झाली होती.एनडीएकडून येणाऱ्या रस्त्याला तर ओढ्याचे स्वरुप आले होते.
सिंहगड रस्त्यावरही अशीच परिस्थिती होती. पाणी वाहत असल्याने वाहनचालक अंदाज बांधूनच पुढे जात होते. परिणामी, वाहतूक संथ पुढे सरकत असल्याने कोंडी झाली होती. रांका ज्वेलर्स येथे झाड पडल्याने वाहतूक एका बाजूने बंद करण्यात आली. कात्रज परिसरात तासभर पाऊस पडत होता. यामुळे दत्तनगर चौकातील राजमाता जिजाऊ ब्रिजखाली गुडघाभर पाणी साचले. सातारा रस्त्यावर पाण्यातून वाळू आणि माती वाहून येत होती.
मान्सूनच्या परतीचा प्रवास
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. ही स्थिती पुण्यात आणखी एक-दोन दिवस राहणार आहे.येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून भारतातून माघार घेईल.