वेल्हे – वेल्हे तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वेल्हे तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. येथील नागरिकांचे बहुतेक जीवन हे भात पिकांवर अवलंबून असते. या पिकाबरोबर नाचणी, वरई या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत.वर्षभर कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेतीचे अशा प्रकारे नुकसान होताना शेतकरी मोठ्या संकाटात सापडला आहे.
हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासधूस होताना बळीराजा हताश झाला आहे. भातपीक लाल पडून लोंब्यातून दाणे पडू लागले आहेत. यावर्षी मोठ्या पावसामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहत होते. शेतातून पाण्याचा निचरा करताना शेतकऱ्यांची दमछाक झाली आहेण त्यातच पावसाळा लांबला, पाऊस थांबता थांबत नाही. वाचलेला भात तयार होऊ लागला अन् पुन्हा परतीच्या पावसाचा फटका भातपिकाला बसत आहे.
सततच्या पावसामुळे पिकावर रोग पडत आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे. वेल्हे, रांजणे, धानेप, कादवे, वरसगाव आदी वेल्हे विभाग व पानशेत धरण परिसरातील अनेक गावांत भाताचे मोठे नुकसान
झाले आहे.
परतीच्या पावसाने भात पीक जमीनदोस्त झाले आहे. कापलेला भात भिजून जात आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिकांची अशी नासधूस होत आहे.
– विठ्ठल मरगळे, शेतकरी, वरसगाव