सातारा – अतिपाऊस आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटांमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरश: हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे हाहाकार माजवला होता. कराड, पाटण तालुक्यात महापूर आला होता तर सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर या तालुक्यांमध्येही पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. खंडाळा, कोरेगाव, फलटण या तालुक्यांच्या काही भागांनाही पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्याउलट माण, खटाव या कायम दुष्काळी भागाकडे यंदाही पावसाने पाठ फिरविली होती. जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिपावसाने तर पूर्व भागात पावसाअभावी बळीराजा हवालदिल झाला आहे.
चाळीस अंशाहून अधिक तापमानाचा उन्हाळा झेलणाऱ्या सातारा जिल्ह्यात ऑगस्ट महिना उलटला तरी पावसाने सुरुवात केली नव्हती. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होईल की नाही, याची शंका होती. पाऊस झाला नाही तर भयानक दुष्काळी परिस्थिती ओढवेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, ऑगस्ट पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाने दमदार एन्ट्री करत पंधरा दिवसांहून अधिक काळ जिल्ह्याला झोडपून काढले. रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा व इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातच नव्हे शहरी भागातही पाणी घुसले होते. विशेषत: कराड, पाटण तालुक्याला महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांवर स्थलांतरीत होण्याची वेळ आली.
अनेक ठिकाणी माणसे व जनावरे पाण्यात वाहून गेली होती. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले, ते शेतकऱ्यांचे. शेतीमध्ये मोठा खर्च करून पेरण्या केल्या होत्या. मात्र, पावसामुळे पिके नासून गेली. अनेक ठिकाणी जमीन खचल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा हाहाकार सुरू असताना पूर्वेकडील माण-खटाव तालुक्यातील जनता मात्र पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसली होती. शेतकरी जनावरांसह बायकापोरांना घेऊन छावण्यांमध्ये आश्रितांचे जगणे जगत होता. पश्चिम भागाकडे जोरदार पाऊस आहे म्हटल्यावर, आपल्याकडेही पाऊस येईल या वेड्या आशेने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी कर्जे काढून, उधार, उसनवाऱ्या करून जमिनी कसल्या आणि पेरण्या केल्या. मात्र, पावसाने या भागाकडे पाठ फिरविली.
अधूनमधून पडलेल्या हलक्या सरींवर पिके कशीबशी उगवली. दीड-दोन महिन्यांमध्ये पिके काढण्यायोग्य झाली. अगदी भरघोस नाहीण पण थोडेफार उत्पन्न निघेल आणि त्यातून काढलेले कर्ज फेडता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने दुष्काळी भागाला जोरदार तडाखा दिल्याने हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतीचे अतिपावसाने नुकसान झाले तर पूर्वेकडील भागात आधी पावसाअभावी आणि आता परतीच्या पावसाने नुकसान झाले.
शेती वाहिली, पिके नासली – कराड, पाटण, सातारा, जावली, वाई, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात सलग पंधरा दिवस आणि आता परतीच्या पावसाने शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. कराड, पाटण तालुक्यातील शेती पुरामुळे वाहूनच गेली तर इतर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीत नुकतीच उगवलेली पिके नासून गेली. पुरातून बचावलेली काही पिके परतीच्या पावसामुळे भुईसपाट झाली आहेत.
दीड लाख हेक्टर शेतीचे नुकसान – जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिपावसामुळे तर माण-खटावमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. दीड लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पिके उगवली नाहीत तर काही ठिकाणी पिके नासून गेली. उसासारख्या बागायती पिकांचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.