मावळ – आठवडाभर कोसळणाऱ्या संततधार पावसाने रविवारी (दि. 4) मावळ तालुका जलमय केला. सर्वाधिक पाऊस असणाऱ्या लोणावळा परिसरात गेल्या 48 तासांत 650 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे भुशी, तुंगार्ली, टाटा, लोणावळा धरणांसह वडिवळे तुडूंब भरले. धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरू वाहू लागली. इंद्रायणीला पूर आल्याने आंदर मावळातील 40 गावांचा संपर्क तुटला. तसेच वडिवळे, कामशेत-नाणे रस्ता, खडकी पूल पाण्याखाली गेल्या नाणे मावळातील 28 गावे “डिस्कनेक्ट’ झाली.
लोणावळ्यातील दमदार पावसामुळे हनुमान टेकडीवरील घराची भिंत एका पत्र्याचे शेडकम घरावर पडल्याने दहा वर्षांच्या मुलाचा बळी गेला. दुसरीकडे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात “कोसळधार’ सुरू असल्याने धरणातून टप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. कोथुर्णे पूल पाण्याखाली गेल्याने खासगी फार्महाऊसमध्ये अडकलेल्या आठ पर्यटकांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने सुटका केली. वाढत्या विसर्गामुळे पवना नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे (केटी) बंधारे आणि गावागावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. एकंदरीत मावळात कोसळणारा पाऊस आणि इंद्रायणी-पवना नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील आंदर, नाणे मावळसह सुमारे 125 गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लहान भावंडांवर भिंत कोसळली; एकाचा मृत्यू
लोणावळा शहरात धुवॉंधार पाऊस कोसळत असून, गेल्या 48 तासांत याठिकाणी तब्बल 650 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी देखील दिवसभर पावसाचा जोर कायम होता. पावसाच्या या पार्श्वभूमीवर शहरात इंद्रायणी नदी काठच्या रहिवाशांना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील हनुमान टेकडी भागात डोंगर उतारावर असलेल्या एका झोपडपट्टी भागात रविवारी सकाळी एक घराचा पाया खाली असलेल्या एका पत्र्याच्या शेडकम घरावर कोसळला. या दुर्घटनेत या शेडमधीलमध्ये झोपेतच असलेल्या कुणाल अजय दोडके (वय 10) या मुलाचा जीव गेला.