इंदापूर, बारामती तालुक्यात तीन हजार एकर बागा संकटात : बागायतदार अडचणीत
भवानीनगर – परतीच्या पावसाने इंदापूर व बारामती तालुक्यातील द्राक्ष बागा पूर्णपणे वाया गेल्या आहेत. पावसामुळे डाऊनी, करपा आणि मूळ कुज आदी रोगांनी द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यात साधारण 70 ते 80 टक्के बागा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. इंदापूर तालुक्यात सुमारे दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्र द्राक्षबागेचे आहे. बारामती तालुक्यात एक हजार ते दीड हजार हेक्टर क्षेत्र द्राक्षबागेचे आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाऊस एवढा पडला नाही. परंतु परतीचा पाऊस मात्र मोठ्या प्रमाणात पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बाधित पिकांचे पंचनामे लवकर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
द्राक्ष बागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने शेतकरी औषधांची फवारणी करीत आहे. साचलेल्या पाण्यामुळे द्राक्षबागांवर दावण्या हा रोग पडला आहे. दावण्या रोगामुळे करपा रोग निर्माण झाला आहे. करपा रोगामुळे द्राक्ष बागेच्या बुडाजवळ कुज हा रोग निर्माण झाला. या तीनही रोगांमुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकरी द्राक्ष बागा वाया जातील, या चिंतेत शेतकरी ग्रासलेले आहेत. त्यातच भर म्हणून द्राक्षबागेवर नवीन रोगाने थैमान घातले आहे. द्राक्ष बाग छाटल्यानंतर जो पाला पडलेला असतो. त्या पाल्याखाली एक विशिष्ट प्रकारची आळी निर्माण होत आहे. ही आळी द्राक्षबागेच्या बुडाखाली लपून बसलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आळी निदर्शनास येत नाही. ही आळी रात्री जमिनीतून बाहेर पडून द्राक्षबागेच्या झाडावर चढून संपूर्ण झाड रात्रीत उद्ध्वस्त करीत आहेत.
या आळीमुळे एवढी भयानक परिस्थिती द्राक्षबागेची निर्माण झाली आहे. ही आळी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी शेतकरी द्राक्ष बागेतील छाटलेले पालापाचोळा पूर्णपणे झाडून द्राक्षबाग स्वच्छ करीत आहेत. मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग लावून प्रत्येक झाडाच्या बुडाखाली उकरून लपलेली आळी बाहेर काढून त्या आळीस मारण्याचे काम शेतकरी करीत आहेत. या आळीवर कोणत्याही प्रकारच्या औषधाचा परिणाम होत नाही. आळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांपुढे प्रत्येक झाडाच्या बुडाशी उकरून त्यातील आळी वेचून काढणे हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यामुळे मजुरांचा खर्च वाढलेला आहे.
एक एकरासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च –
एक एकर द्राक्षबागेसाठी किमान औषधांचा खर्च दीड ते दोन लाखांपर्यंत जात आहे. परंतु हा खर्च करताना सध्या पडलेल्या परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागेतून शेतकऱ्यांना पुढील काळात मिळणारे उत्पन्न मिळेल का नाही, ही शाश्वती राहिली नाही. शेतकरी उद्याच्या आशेवर सध्यातरी द्राक्ष बागांना रोगांपासून व किडीपासून वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा वापर करीत आहे. परंतु परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागेचे पीक शेतकऱ्यांच्या हातात पडते की नाही, हा प्रश्न गंभीर बनला आहे. द्राक्षबागेमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे.
उधार, उसनवारीवर औषध फवारणी –
औषधे दुकानदारांकडून उधारीवर औषधे शेतकरी घेऊन शेतामध्ये फवारणी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी उद्याच्या आशेवर हा खर्च करीत आहे. सध्या परतीच्या पावसामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील द्राक्षबागेचे पीक सत्तर ते ऐंशी टक्के वाया जाण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. उसाचे पीक सोडले तर परतीच्या पावसामुळे काही उभी पिके वाया गेली आहेत. त्यामुळे द्राक्षबाग, डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यात दावणी, करपा, कुज आणि अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.