जळोची येथील स्थिती : मतदार घराबाहेर पडणार का?
बारामती – बारामती शहर व तालुक्यात गेले दोन दिवस संततधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे पाणी साचले असून मतदान केंद्र देखील पाण्याखाली गेले आहेत. सोमवारी (दि. 21) प्रत्यक्ष मतदान होत असून त्याबाबत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, असे असले तरी शहरातील काही मतदान केंद्र पाण्याखाली गेले आहेत. पावसाची संततधार अशीच कायम राहिल्यास पाणी वाढणार असून याबाबत प्रशासन काय खबरदारी घेतली असली तरी मतदार घराबाहेर पडणार का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
जळोची येथील मतदान केंद्र पाण्याखाली गेले असून केंद्राच्या आवारात पाण्याचे तळे साचले आहे, त्यामुळे सोमवारी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. बारामती शहरात दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. पावसाची संततधार अशीच राहिली तर मतदानाला बाहेर पडताना मतदारांची देखील तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सर्व तयारी झाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी अडथळा येण्याची शक्यता होती;मात्र त्याबाबत खबरदारी घेण्यात आले आहे वॉटरप्रूफिंग तसेच ताडपत्रीचा उपयोग करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे.
– दादासाहेब कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी
गेले दोन दिवस बारामती शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे बारामती शहरातील काही मतदान केंद्राच्या आवारात पाणी साचले आहे.त्याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. पाऊस पडत असला तरी मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मताचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न आहेत.
– किशोर मासाळ, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस