वादळी पावसाने ऊस, द्राक्षबागांमध्ये पाणीच पाणी : रब्बी हंगामास पोषक
भवानीनगर – काटेवाडी, भवानीनगर परिसरात सकाळी नऊपासून दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत भवानीनगर परिसरात तीन ते चार पाऊस झाले आहेत. आज सकाळी झालेला हा पाऊस जोरदार होता, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यात दिलासा दिला होता. सध्या वादळी पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पिकांमध्ये पाणी साचलेले आहे. कित्येक दिवस शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत होते. पावसाळा सुरू होऊनही दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे परतीच्या पावसाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
पावसाने आज सकाळपासून जोरदार स्वरूपात पडण्यास सुरुवात केली. सकाळी नऊपासून ते सायंकाळी पाचपर्यंत संततधार पाऊस बरसला. त्यामुळे रस्त्यावर देखील जागोजागी पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचण निर्माण झाली होती. इंदापूर तालुका व बारामती तालुका कायमस्वरूपी पावसापासून दूर राहिलेले तालुके आहेत. इंदापूर व बारामती तालुक्यातील काही भागातील शेती मात्र पाण्याविना पूर्ण वाया गेली होती. परंतु आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसाठी पाणी मिळाल्याने शेतकरीही सुखावला आहे. अशाच प्रकारे तीन ते चार वेळा पाऊस पडला पुढील काळातील शेतीच्या पाण्याबाबतची चिंता थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पिके पाण्याविना जळून जातात. त्यामुळे ही पिके वाचवण्यासाठी पाण्यामुळे हातभार लावला असल्याचे दिसत आहे.
भूजल पातळीत वाढ होणार –
सध्या माळरानावरील शेतात बाजरीचे पीक उभे आहे. या बाजरीला पाण्याची गरज होती. ही गरज पावसाने भरून काढली आहे. त्यामुळे बाजरी शेतकऱ्यांच्या हाताला लागणार आहे. परतीच्या पावसातील हा पहिलाच मोठा पाऊस साधारण नऊ तास सुरू आहे. त्यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील पिकांना चांगल्या प्रकारे पाणी मिळणार आहे. पाऊस पडून जमिनीत पाणी मुरले तर विहिरींच्या पाण्याची पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे अजून दोन ते तीन मोठे पाऊस गरजेचे आहेत, असे काही जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.