पुणे – अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत मिळत आहे. या दोन्ही गोष्टी पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे. सध्या दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असते. तसेच रात्र झाली की जोरदार पावसाला सुरुवात होते. सोमवारी रात्रीसुद्धा असाच पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सुद्धा रात्रीच पावसाने हजेरी लावली. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे.
अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागांत पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून उत्तरकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे आगामी 3 दिवस पावसाचे राहणार आहे. संततधार पाऊस, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.