पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांच्या दैनंदिनीला बसली खीळ
शिक्रापूर – पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने तळेगाव ढमढेरेत वेळ नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली असल्याने वाहतुकीचा संपूर्ण खोळंबा झाला. यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागला.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वेळ नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांची दैनंदिनीला खीळ बसली असून येथील पुलावरून निमगाव म्हाळुंगी, पारोडी, टाकळी भीमा, कासारी, घोलपवाडी, उरळगाव यांसह इतर गावांच्या नागरिकांना प्रवास करावा लागतो. या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून तरकारी व्यावसायिक व दुधव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. पुलावर पाणी असल्यामुळे वाहतूक खोळंबळी होती. अशा व्यावसायिकांना पर्यायी रस्ता म्हणून दहा ते पंधरा किलोमीटरवरून तळेगावात यावे लागले. तर काहिंनी घरीच राहण्याचे पसंत केले.
मागील आठवड्यातही या परिसरात पावसाने चांगलेच झोडपले. शेतकरी शेतीचा माल काढण्यासाठी पाऊस उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे. तोंडात आलेला घास हिरावून जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
न्हावरा रस्त्यावर घोलपवाडी ठिकाणी जास्त झालेला पावसाचे पाणी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे पुराचे स्वरूप आले होते आणि त्यामध्ये एक मनुष्य वाहून गेला असल्यामुळे पाण्यातून प्रवास करण्याचे धाडस कोणीच करत नव्हते.
मागील काही दिवसांत पावसाने चांगल्याप्रकारे हजेरी लावून धुमाकूळ घातल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची पातळी वाढल्यामुळे येथील पुलावरून पाणी वाहू लागले होते. शाळेतील विद्यार्थ्यांची व पालकांची या पुलावरील पाण्यामुळे चांगलीच धांदल उडाली. त्यांना ऐनवेळी नैसर्गिक आपत्तीमुळे शाळेला उशीर ही झाला होता. वेळेच्या आधी पोहोचणे महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी पर्यायी मार्गाने शाळा, महाविद्यालय गाठले.