हवामान विभागाने वर्तवला अंदाज
मुंबई : मागील चार महिन्यापासून देशासह राज्यात पडणाऱ्या पावसाचा मुक्काम आणखी आठवडाभर राज्यात राहणार असल्याचे दिसत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत विजांच्या गडगडटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सात ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिकसह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात 8 तारखे पर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 12 तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 तारखेपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
देशात परतीच्या पावसाची सुरुवात राजस्थानच्या वायव्येला 10 ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. राजस्थानातील पाऊस सध्या ओसरत असून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाच्या दीर्घकालीन अनुमानानुसार या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईकडे पावसाने पाठ फिरवली असून रविवारी तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन पारा 34.5 अंश सेल्सियस इतका वाढला. त्यामुळे दिवसभर उन्हाचा ताप वाढला. उत्तर भारतात हवामानामध्ये वेगाने बदल होत असून शरदाची चाहूल लागली आहे.