भारतात विविध प्रकारच्या धार्मिक, सामाजिक रूढी कायम असल्या तरी त्यामुळे व्यसनाधिनता आणि तरुणांत वाढलेल्या खाण्यापिण्याच्या अनियमितेमुळे हृदयविकाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतात येत्या काळात एकूण मृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू फक्त हृदयविकारामुळे होतील. यापैकी अर्धे मृत्यू 35 ते 45 वयोगटातील असतील, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारत 2025 पर्यंत सर्वाधिक हृदयरोगींचा देश होईल, असे भाकीतही जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे.
भारतात 2018 साली 47 टक्के मृत्यू हृदय विकारामुळे झाले होते व आता त्यात 6 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे दिसत आहे. दरवर्षी जगातील तीन कोटीहून अधिक नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्स, टीबी, मलेरिया, मधुमेह व सर्व प्रकारच्या कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैक पटीने जास्त आहे.
भारत हा तरुणांचा देश आहे. जागतिकीकारणामुळे आजच्या तरुणपिढीत जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. याचा अतिरिक्त ताण त्यांच्या शरीरावर येत आहे. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण तरुणांत वाढत आहे. जीवनशैलीचा प्रभाव किंवा वाढत्या जबाबदारीचे ओझे इत्यादी कारणांमुळे अलीकडे तरुण कमी वयातच आजाराच्या विळख्यात अडकत आहेत, हे वास्तव आहे. जास्त पैसे कमावणे, मौजमस्ती, मद्य, नशा, धूम्रपान आणि जंकफूडवर प्रचंड पैसा खर्च करणारी आजची तरुणपिढी रोगग्रस्त बनत चालली आहे. ही पिढी फास्ट फूड आणि जंक फूडच्या आहारी गेली आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत हे तरुण चटपटीत स्वादाच्या लोभापायी असे अन्नपदार्थ खातात, ज्यामुळे त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे स्थूलपणा आणि हृदयासंबंधी आजाराला आमंत्रण मिळते.
आयुर्वेद सर्वोत्तम : हृदयरोगाच्या सर्वागीण चिकित्सेविषयी अधिक माहिती व भारतीय वैद्यकशास्त्र आयुर्वेद यात भरीव मदत कशी करू शकेल. निरोगी व्यक्तींना हृदयरोगास कारणीभूत घटकांची माहिती देणे, आरोग्यकर आहारविहार व ऋतूनुसार त्यात केले जाणारे बदल म्हणजेच दिनचर्या व ऋतुचर्या यांचे महत्त्व बालपणापासूनच शिकवणे. नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, अभ्यंग, पंचकर्म (शरीर शुद्धीकरण) चिकित्सा नियमित करणे इ. उपायांनी शरीराचे स्वास्थ्य टिकवून ठेवले जाते, वृद्धत्व टाळले जाते. डायबेटीस, ब्लडप्रेशरसारखे रोग त्यांच्या प्राथमिक लक्षणांना वेळीच योग्य औषधोपचार व पंचकर्माच्या साहाय्याने उत्पन्न होऊ न देण्याचा प्रयत्न केला पाहिजे व म्हणूनच या लक्षणांविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
या आजारांची सुरुवात अगोदरच झाली असेल तर तो वाढू न देणे व भविष्यकालीन पक्षाघात, किडनी फेल्युअर या गंभीर उपद्रवांना रोखण्यासाठी अधिक सजगतेने चिकित्सा केली गेली पाहिजे. निव्वळ औषधे खाऊन नियंत्रणात आहे, या भ्रमात राहण्या-या व्यक्तींना आहारात, जीवनशैलीत आवश्यक तो बदल करण्याविषयी मार्गदर्शन करून, पंचकर्म उपचार इ च्या साहाय्याने आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार प्रोत्साहित केले पाहिजे. शारीरिक-मानसिक ताणतणाव, लट्ठपणा यांसाठी शिरोधारा, अभ्यंग, उद्वर्तन, बस्ती यासारखे उपाय नेमाने करावेत.
ज्या व्यक्तींना हृदयविकार जडला आहे, अशा व्यक्तींना हृदयविकार, पक्षाघात समान संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना, त्यांची लक्षणे व खबरदारीच्या उपाययोजना याविषयी जागरूक केले पाहिजे. छातीत येणारी पहिली कळ धोक्याची घंटा समजून त्वरित औषधोपचार व आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. अशाने बायपाससारख्या शस्त्रक्रिया टाळता येतील.
दुर्लक्ष केल्याने आजार जुना होईल तशी हृदयात विकृती (रचनात्मक व क्रियात्मक) उत्पन्न होते. बायपासने रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर करता येत असले तरी हृदयाची अथवा रक्तवाहिन्यांची झालेली हानी भरून निघत नाही. हृदयाच्या मांसपेशी व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारले जावे, या दृष्टीने तसेच हृदयाकडील सूक्ष्म रक्तसंवहन वाढवणारी चिकित्सा करणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक औषधोपचार,
पंचकर्मोक्त विरेचन, रक्तमोक्षण, हृद्-बस्ती व बस्तीचे विविध प्रकार व रसायन उपचारांनी या प्रकारचे सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
आयुर्वेदिक औषधोपचारांने व जलौकावचारण या उपचारांनी भविष्यात असे संकट येऊ नये, याची काळजी घेतली जाते. हृदयरोग संबधित घटकांचा विचार करून परिपूर्ण उपचार केले गेले तर हृदयरोगाचा वाढता प्रादुर्भाव थोपवणे आपल्याला सहज शक्य होईल. आपण आपल्या हृदयाची काळजी घेण्याचा संकल्प करून हृदयासाठी आरोग्यकारक अशा जीवनशैलीचा अंगीकार करूया!
हृदयविकाराचा प्रतिबंध
धूम्रपान पूर्णपणे टाळले पाहिजे. उच्चरक्तदाब, मधुमेह आणि उच्च प्रमाणातील कोलेस्टेरॉलसारखी इतर लक्षणे व आजार नियंत्रणात ठेवणे. रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करणे, आपल्या प्रकृतीसाठी योग्य इतक्या प्रमाणात वजन आटोक्यात ठेवणे, फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला आणि सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्टेरॉल व मांसाहारी घटकांचे प्रमाण कमी असणारा पौष्टिक आहार नियमित घेणे. तुमचे एकंदरीत कोलेस्टेरॉल आणि एलडीएल कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवल्याने हृदयविकार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. अतिरिक्त ताण टाळून त्याऐवजी शारीरिक व्यायाम, चालणे, ध्यानसाधना, लांबपर्यंत चालत फिरायला जाणे, छंद जोपासणे, संगीत ऐकणे किंवा मनाला आराम देतील, अशा ध्वनिफिती ऐकणे आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे यासारख्या गोष्टींमुळे कार्डिओव्हस्क्युलर आजाराचा धोका टाळण्यास खूप मदत होते.