नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने वकील मुकुल रोहतगी वेळेत हजर न राहिल्याने तहकुबीची वेळ आली आहे.
न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होत आहे. आजच या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. वकिलांच्या अनुपस्थितीमुळे याचिकाकर्ते आणि विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. परंतु राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी नसल्यामुळे सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या वतीने एकही वकील उपस्थित न राहल्याने सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तांत्रिक कारणांमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगशी कनेक्ट होऊ शकलो नाही. आज दिवसभरात सुनावणी होईल, त्यावेळी कनेक्ट होऊ असे मुकुल रोहतगी म्हणाल्या. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. “आजची सुनावणी संपलेली नाही, पासओव्हर झाली आहे. म्हणजेच दिवसभरात हे प्रकरण सुनावणीसाठी येईल, तेव्हा या खंडपीठासमोर नाही तर घटनापीठाकडे सुनावणी व्हावी ही आमची बाजू मांडू. त्यामुळे कुठलाही निर्णय झालेला नाही. तसंच सरकारी वकील मुद्दाम गैरहजर राहिले असाही विषय नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.