Maharashtra Political Cricis – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली खलबते अखेर आज (गुरुवारी) थांबली. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्याकडून देशातील सर्वोत्कृष्ट वकिलांची फौज गेल्या ९ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत होती. सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाले असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सत्तासंघर्षावरील निकाल कधीपर्यंत जाहीर करण्यात येईल याबाबत स्पष्टता दिली नसली तरी लवकरच निकाल जाहीर होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बुधवारी राज्यपालांकडून युक्तिवाद केल्यानंतर आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल व अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर बोट ठेवलं. याला उत्तर देताना ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी, सर्वोच्च न्यायालयाने जैसेथे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही बहुमत चाचणीचे आदेश दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दाच गैरलागू होतो, असा युक्तिवाद केला.
उद्धव ठाकरेंचा राजीनामा डोकेदुखी ठरणार?
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायला हवे होते असे मत वेळोवेळी मांडले होते. अशातच आज उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्यासाठी केलेली घाई त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
घड्याळाचे काटे उलटे कसे फिरवणार?
सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवारी) ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू संघवी युक्तिवाद करत असताना सर न्यायाधीशांनी त्यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असल्याने आम्ही घडल्याचे काटे पुन्हा उलटे कसे फिरवू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला. यावर संघवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यापुर्वी घडलेल्या घटनांचा दाखल देत १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यापर्यंत परिस्थिती मागे घेऊन जाण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १५ मे पूर्वी?
दरम्यान, ५ सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी सुरु असून सर्वोच्च न्यायालयाने आज याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. या घटनापीठाचे सदस्य असलेले आर एम शहा हे न्यायाधीश येत्या १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षावरील निकाल १५ मे पूर्वी जाहीर केला जाऊ शकतो अशी शक्यात आहे.
कावळाही काळा अन् कोकीळही
ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी, विधानसभेतील गटनेतेपदाचा व प्रतोदचा मुद्दा उपस्थित केला. गटनेतेपद हे पक्षाचे प्रमुख ठरवत असतात, त्यामुळे शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी केलेली निवड अवैध असल्याचं म्हंटलं. तसेच सर्वोच्च न्यायालयात आपणच शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट, निवडणूक आयोगात मात्र आपण एक गट असल्याचं लेखी मान्य करतो, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले. आपला युक्तिवाद संपवताना त्यांनी, कावळाही काळा अन् कोकीळही काळी. खरी शिवसेना कोण हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातूनच कळेल असं म्हंटल.