दुधी भोपळा रस
दुधी भोपळ्यामध्ये गोड आणि कडू असे दोन प्रकार असतात. ते वेलीवर होणारे फळ आहे. गोड दुधीचा उपयोग खाण्यासाठी करतात. कडू दूधी भोपळ्याला “तुंबड्या’ असे म्हणतात. खाण्यासाठी नेहमी कोवळ्या दुधीचा उपयोग करावा.
गुणधर्म : दुधी, थंड, सारक, पौष्टिक, गोड, धातुवर्धक, रुचकर, हृदयास हितकारक आणि पित्त व कफहारक आहे. दुधीचा ताजा रस मातेच्या दुधाप्रमाणे पोषक असतो. कडू दुध्या भोपळ्याचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी पेटा तयार करण्यासाठी करतात; तर चवीला गोड असणारा दुधी औषधासाठी वापरतात.
घटक :
पाणी 96.3 टक्के
प्रोटिन 0.2 टक्के
चरबी 0.1 टक्के
कार्बोदित पदार्थ 2.9 टक्के
कॅल्शियम 0.02 टक्के
फॉस्फरस 0.01 टक्के
लोह 0.7 मि. ग्रॅम.
उपयोग : मधुमेही रुग्णांना दुधीरसाचा उपयोग होतो कारण यात कार्बोदित पदार्थ कमी असतात. तापामध्ये या रसाचे सेवन करावे. वाफवलेला दुधी खाल्ल्याने बद्धकोष्ठता नाहीशी होते आणि रक्ताम्लात कमी होते तसेच हृदय बलवान होते व नियमित दुधी भोपळ्याच्या रसाच्या सेवनाने वजन संतुलित राहते. हृदयविकार होत नाहीत. बायपास सर्जरीसारख्या महागड्या सर्जरींपासून मुक्ती मिळते. दुधी रस नेहमी ताजा घ्यावा. त्यामध्ये थोडी जिरे पूड आणि शेंदेलोण व पांदेलोण घालावे.
क्षयरोग्यांना दुधीचा रस दिल्याने त्यांचा खोकला कमी होतो व त्यांचे वजन वाढते. या रसाच्या सेवनाने गरोदरपणात शक्तीवर्ध असतो. दुधीच्या रसात थोडा मध घालून प्यायल्याने शरीराचा दाह, घशाची जळजळ, रक्तविकार, गळवे, सर्दी, नाकातून रक्त पडणे वगैरे विकार नाहीसे होतात. सर्व प्रकारच्या मूत्रविकारात दुधी गुणकारी आहे.
नारळ
नारळ हे मुख्यता भारत व पॅसिफिक महासागरातील बेटांवरील फळ आहे.
गुणधर्म : ओल्या नारळाचे पाणी थंड, आल्हाददायक, पोषक, मूत्रगामी, मूत्राचा रंग सुधारणारे व तृषाशामक आहे. नारळ जर कच्चा असेल व त्याच्या आत मलई जर तयार झाली नसेल तर त्या पाण्यात मधुरता कमी असते. तसेच ते थोडेसे आंबट किंवा काहीसे तुरट असते. परंतु खोबरे आत तयार होऊ लागल्यानंतर त्याचे पाणी एकदम मधुर बनते. नारळाच्या पाण्यात असणाऱ्या साखरेचे शरीरात त्वरित शोषण होते. ते पाणी जंतुमुक्त असल्याने अत्यंत सुरक्षित, निर्धोक असते. कॉलऱ्यामध्ये ओल्या नारळाचे पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते.
घटक :
पाणी 95.5 टक्के
सोडियम 105 मि. ग्रॅम
पोटॉशियम 312 मि. ग्रॅम
कॅल्शियम 29 मि. ग्रॅम
मॅग्नेशियम 30 मि. ग्रॅम
लोह 0.1 मि. ग्रॅम
तांबे 0.04 मि.ग्रॅम
फॉस्फरस 37 मि. ग्रॅम,
सल्फर 24 मि. ग्रॅम
क्लोरिन 183 मि. ग्रॅम
“बी’ गटातील जीवनसत्त्व
1 नियासिन 0.64 मि. ग्रॅम,
पॅन्टॅथिनिक ऍसिड 0.52 मि. ग्रॅम
बायोटिन 0.02 मि. ग्रॅम
रिबोफ्लाविन 0.01 मि. ग्रॅम
पाइरिडॉक्सिन अल्प
ओल्या नारळाच्या पाण्यात क्षार आणि बी गटातील जीवनसत्त्वे असल्याने त्या पाण्याचे महत्त्व अधिक आहे.
औषधी उपयोग : कॉलऱ्यामध्ये नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर आहे. कॉलऱ्यामध्ये जुलाब व उलट्या होत असल्याने शरीरातील पाणी कमी होते व क्षारांची त्रुटी निर्माण होते. अशा वेळी नारळाचे पाणी शरीराला जरूर ते पाणी आणि क्षार पुरवते. नारळाचे पाणी जंतुनाशक असल्याने आतड्यामध्ये कॉलऱ्याचे जंतू असतील तर त्यांचा नाश करते.
कॉलऱ्यामध्ये पोटॉशियम सॉल्टचे इंजेक्शन देण्याऐवजी नारळाच्या पाण्यातून नैसर्गिक पोटॉशियम देण्यात आले तर ते अधिक हितावह असते. नारळाच्या पाण्यात असणाऱ्या “बी’ गटातील जीवनसत्त्वांमुळे हृदय सुदृढ होते, तसेच ज्ञानतंतू आणि पचनसंस्था निकोप ठेवण्याचे ते काम करते. नारळ जसजसा जून होत जातो तसतसे त्यातील पोषक घटक नष्ट होत जातात, म्हणून कोवळ्या नारळाच्या पाण्याचे सेवन करणे अधिक हितावह आहे.
नारळाच्या ताज्या पाण्याचा त्वरित उपयोग केला पाहिजे. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळला असता नारळाच्या पाण्यामध्ये असणारी “सी’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. नारळाचे पाणी मूत्रगामी असल्याने सर्व प्रकारच्या मूत्रविकारात व मूतखड्यामध्ये ते अत्यंत गुणकारी आहे.
नारळाचे पाणी त्वचारोगावरही उपयुक्त असते तसेच अशक्तपणात ते सलाईनसारखे काम करते. चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या असतील त्यावर नारळाचे पाणी हे “क्लिझिंग’ सारखे काम करते. चेहरा नितळ होण्यासाठी व सौंदर्यवृद्धिसाठी नारळाचे पाणी उपयुक्त आहे.
– सुजाता टिकेकर