सक्षमीकरणाची गरज : करोनामुळे समोर आल्या मर्यादा
अनास्था सार्वजनिक आरोग्याची
पुणे – शहरातील सरकारी आरोग्य यंत्रणा कशी सज्ज नाही आणि ती अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे, हे करोनाच्या निमित्ताने लक्षात आले. तहान लागल्यानंतर विहीर खणण्याचा प्रकारही समोर आला असून, “पॉलिटिकल प्रायॉरिटी’ नसलेला “आरोग्य’ हा विषय आता “प्रायॉरिटी’वर असेल, अशी अपेक्षा आहे.
“आरोग्य’ विषयाला “प्रायोरिटी’ मिळणार का? नागरिकांचा सवाल
शहराचे सार्वजनिक आरोग्य हा विषय आधीपासूनच दुर्लक्षित राहिला आहे. त्याकडे लक्ष दिले असते तर दीडशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले दवाखाने आणि रुग्णालये आज किती अत्याधुनिक झाली असती, याचा विचार न केलेलाच बरा. पुणे महापालिकेच्या दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या हजार-बाराशे पदांमध्ये सुमारे सव्वाशे ते दीडशे पदे ही डॉक्टरांचीच आहेत. करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचा हाहाकार सुरू असताना, ही पदे अजून भरलीच जात आहेत. तीदेखील हंगामी तत्त्वावरच भरली जाणार आहेत. त्यामुळे अन्य विकास साधताना शहराच्या आरोग्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
…डॉक्टर भरतीकडे दुर्लक्ष?
मनुष्यबळ भरणे हा राजकीय नेत्यांच्या प्राधान्याचा विषय का नाही? मग प्राधान्याचे विषय कोणते? तर एकदा भरती प्रक्रिया केली की, तेथे पुन्हा भ्रष्टाचाराला वाव मिळत नाही. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केले जाते, पण दुसऱ्या बाजूला शिपाई, क्लार्क भरतीकडे जास्त लक्ष असते; कारण येथे कार्यकर्त्यांचे पुनर्वसन, त्याने निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड असे त्याचे “गणित’ असते. परंतु डॉक्टर किंवा तज्ज्ञांची भरती येथे कार्यकर्त्यांशी संबंधित विषय फारसा येत नाही, त्यामुळे जास्त लक्षही घातले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
डायलिसीस सेंटरचे पेव
मध्यंतरी प्रत्येक प्रभागात डायलिसिस सेंटरचे पेव फुटले होते. त्यासाठी अक्षरश: लाखोंची मशीनरी खरेदी करण्यात आली. त्यातील किती सुरू आहेत, हा प्रश्नच आहे. कमला नेहरू रुग्णालयात अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला, परंतु तो सद्यस्थितीत सुरू आहे आहे का? तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक अद्यापही झाली नाही. ही मशिनरी चालवण्यासाठी, औषधे देण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हाच या व्यवस्थेचा आत्मा आहे तोच न भरण्याचा प्रकार एवढ्या वर्षांत झाला आहे. कोथरूडमधील बिंदुमाधव रुग्णालय, सारस बागेजवळील बाळासाहेब ठाकरे रुग्णालय यांना धरून किमान सात ते आठ रुग्णालये बांधून तशीच बंद अवस्थेत आहेत. तेही केवळ मनुष्यबळ नसल्या कारणाने हे झाले आहे.
औषधे, साधनसामग्री आणि इमारतीवरच भर
आजपर्यंत महापालिकेने औषध खरेदी, वैद्यकीय साधनसामग्री खरेदी आणि दवाखन्यांच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्चून मोठमोठ्या “पॉश’ इमारती बांधणे एवढेच काम केले आहे. त्यामध्येही कोणाचे काय “इंटरेस्ट’ असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.