जालना – ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले, तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकते. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच राज्यात बऱ्याच ठिकाणी शाळा सुरु झाल्यात, ज्या झाल्या नाहीत त्यांनी शाळा सुरू कराव्यात अशाच आमच्या सूचना राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे म्हणाले, दर सोमवारी होणाऱ्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोससाठी केंद्राकडे आग्रह धरला जाणार आहे. याशिवाय राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
ओमायक्रॉनची वाढती रुग्ण संख्या पाहता परदेशातून आलेल्या 100 टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत.
राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परिस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्रसरकारशी चर्चा करुनच निर्णय होईल, असे राजेश टोपे म्हणाले.