मुंबई – सध्या राज्यात नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. लाॅकडाऊन लावले तर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. यामध्ये गरिब आणि कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्यातील 90 टक्के जनतेची लाॅकडाॅऊन न करण्याची मागणी आहे. विरोधी पक्ष भाजप तसेच सरकारमधीलही काही प्रतिनिधींची लाॅकडाऊन न करण्याची मागणी आहे.
राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सध्या लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लाॅकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करून ठेवणे गरजेचे असते, असे आरोग्यामंत्र्यांनी एका खासगी वृत्तवाहिशी बोलताना सांगितले आहे.
राज्यात 2 एप्रिलपासून लाॅकडाऊन लागू करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर त्यांना करोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लाॅकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच येत्या एक-दोन दिवसांत काही कठोर निर्बंधांची घोषणा करण्यात येईल. राज्यातील नागरिक 15 दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर नक्कीच करोनाची साखळी तुटू शकते. मात्र, जर करोना आटोक्याच्या बाहेर गेलाच तर शेवटचा पर्याय म्हणून लाॅकडाऊनचा शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा म्हणल्यावर लाॅकडाऊन करणे भागच आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.