जालना – दिवाळी संपल्यानंतर राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यात करोनाची दुसरी लाटेची भीती वाढत आहे. परंतु, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही.
मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशाने करोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा करतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच दिवाळीच्या दिवसात टेस्ट कमी केल्या होत्या. मात्र आता करोनाच्या टेस्टही वाढवण्यात आल्या आहे. अशारीतीने टेस्टिंग वाढल्यात म्हणजे करोनाबाधितांची संख्याही वाढेल. याचा अर्थ लाट वैगेरे येईल असा होत नाही. मात्र काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. गरज पडल्यास कठोर पावले उचलावी लागतील. याशिवाय लग्न समारंभासाठी जी 200 जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती त्याबाबत पुर्नविचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.