इस्लामपूर : कोरोनाच्या बिकट परिस्थितीत राज्य शासनाचे आरोग्य खाते आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. हेच खरे कोरोना योद्धे असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर ( जिल्हा. सांगली) येथील लोकराज्य विद्या फाउंडेशनतर्फे अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक, गौरव नायकवडी उपस्थित होते.
सामाजिक कार्याबद्दल इस्लामपूरचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांना तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक शेंडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकराज्य विद्या फाऊंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी स्वागत-प्रस्तावित केले.
मंत्री डॉ. पाटील म्हणाले,” कोरोनाच्या निमित्ताने इस्लामपूर शहर राज्यात सर्वप्रथम चर्चेला आले. कोरोनाच्या काळात अनेक खासगी हॉस्पिटल बंद होती. तेव्हा राज्याच्या आरोग्य खात्याने वैद्यकीय सेवा देताना मोठे योगदान दिले. तर शेवटच्या आर्थिक स्तरातील गोरगरीब माणसाला मदतीचा हात दिला तो सामाजिक कार्यकर्त्यांनी. कपिल ओसवाल यांच्या कार्याचे कौतुक आहे. आजचा पुरस्कार आरोग्य अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आहे.
मंत्री डॉ.पाटील म्हणाले,” लोकराज्य विद्या फौंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजाची तळमळ आहे. यामुळेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात अनेक स्मशानभूमी विद्रुप असतात. अशा परिस्थितीत नव्या पिढीतील तरुणांना व देशाला प्रेरणा देणारी भूमिका आहे.”
अण्णासाहेब डांगे म्हणाले,” चंद्रशेखरचा उपक्रम अनकेदा वेडेपणाचा वाटतो. ही समाजसेवा आहे. देशकार्य आहे. आणखी नवं करायला हवे. याला समाजाची साथ हवी. चंद्रशेखरचे कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे. त्याला अखेरच्या श्वास असे पर्यत पाठबळ असेल.”
राहुल महाडिक म्हणाले,” चंद्रशेखर यांनी स्वच्छतेचा वसा घेतला आहे. समाजाचे खरे समाजसेवक यानिमित्ताने पुढे येत आहेत. पडद्यामागेही समाजसेवक आहेत ते ही कौतुकास पात्र आहेत. कपिल ओसवाल आणि डॉ. अशोक शेंडे यांची निवड योग्य आहे.”
सागर खोत म्हणाले,” लोकराज्य विद्या फौंडेशन तर्फे सुरू असणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, डॉ. प्रदिप शहा, नगरसेवक चेतन शिंदे,माजी नगरसेवक सतीश महाडिक, सुजित थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करून मोजक्याच प्रमुख लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
इथं करेक्ट कार्यक्रम करणारे..! मग कसं प्रेमाने वागून चालेल ?
स्मशानभूमीत आपण अंतर्मुख व्हायला हवे. सर्वांशी प्रेमाने वागायला हवे असे प्रस्ताविकातील वक्तव्याचा संदर्भ देत गौरव नायकवडी म्हणाले,” स्मशानभूमीत चंद्रशेखर तांदळे नेमके काय उपक्रम राबवतो या बाबतीत उत्सुकता होती. पण इथं करेक्ट कार्यक्रम करणारे आहेत. मग कसं प्रेमाने वागून चालेल ? हा वाळवा तालुका आहे. असे म्हणत नाव न घेता मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला.