शहरातील काही केंद्रांवर परीक्षा उशिराने
पुणे – आरोग्य विभागातील सरळ सेवा रिक्त पदांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला. शहरातील काही केंद्रांवर जवळपास अर्धातास परीक्षा उशिराने सुरू झाली. राज्यातील मराठवाडा, कोकण, विदर्भ या ठिकाणी एकाच बाकावर दोन उमेदवार, प्रश्नपत्रिका फुटणे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यामुळे सरळसेवा पदभरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सुमारे 3 हजार जागांसाठी आरोग्य विभागातील लिपिक व इतर पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने निवडलेल्या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. रविवारी राज्यभरात परीक्षा होत असताना स्थानिक प्रशासन व एजन्सी यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला.
औरंगाबादमध्ये फोनद्वारे उत्तर सांगणारे रॅकेट पकडण्यासह डमी उमेदवार बसविणे, परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग न ठेवता एका बेंचवर दोन उमेदवार बसविणे, बेंचवर परीक्षा क्रमांक नसणे असे प्रकार नाशिक, रत्नागिरी, नागपूर, नगर यांसह इतर जिल्ह्यांमध्ये घडले आहेत. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले असून, संतप्त झालेल्या उमेदवारांनी गोंधळ घातल्याने दिसून आले.
यासंदर्भात एमपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे म्हणाले, “आरोग्य विभागाची परीक्षा घेताना कोणतेही नियोजन नव्हते. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणून ही भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व्हायला हवी, अशी आमची प्रमुख मागणी आहे.’