प्रभात ऑनलाइन – कोणतीही भाजी अथवा फळं जास्त दिवस ताजे राहावेत, टिकावेत यासाठी आपण सर्रास फ्रिजमध्ये ठेवत असतो. खाद्यपदार्थ, शीतपेय, अशा अनेक जिन्नासांचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे फ्रिज. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही ठराविक पदार्थ किंवा भाज्या फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पाहुयात, फ्रिजमध्येकोणत्या दहा भाज्या तसेच पदार्थ ठेऊ नयेत.
1. टोमॅटो
फ्रिजमध्ये जास्त प्रमाणात पाणी असलेले टोमॅटो आणि भाज्या ठेवू नका, यामुळे ते फ्रीजच्या थंड तापमानात लिबलीबीत होऊन खराब होऊ शकतात. बर्याच वेळा आपण दोन-तीन दिवस फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवतो. मात्र यामुळे ते लिबलिबीत होऊन त्यांच्यात किडेदेखील होतात. कधीकधी टोमॅटो खराब होऊन त्यानंतर दुर्गंधी सुटते. यामुळे फ्रीजमधील इतर वस्तूदेखील खराब होऊ शकतात..
2. सोया सॉस
सोया सॉस फ्रीजमध्ये ठेवू नये. सोया सॉस, टोमॅटो केचअप अशा बर्याच गोष्टी ज्या फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
3. टरबूज-खरबूज
कापल्यानंतर आपण टरबूज आणि खरबूज रेफ्रिजरेटरमध्ये अजिबात ठेवू नये. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकतात. काकडी, टरबूज आणि खरबूज खाण्यापूर्वी काही वेळासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता.
4. मध
फ्रिजमध्ये मध ठेवू नका. असे केल्याने त्यात दाणे पडू शकतात, ज्यामुळे त्याची चव खराब होते. सामान्य तापमानात थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवल्यास मध खराब होत नाही.
5. जाम
जामवर प्रक्रिया केली जाते जेणेकरून ते उघडल्यानंतरही फ्रीजच्या बाहेर ठेवता येते. लवकर खराब होत नाही.
6. बटाटा
कच्चे बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची चव गोड होते आणि बटाटेही खराब होतात.
7. केळी
फ्रीजमध्ये ठेवल्यास केळीही काळी पडते. इथिलीन वायू त्याच्या देठातून बाहेर पडतो जो आजूबाजूची फळे पटकन पिकवतो.
8. तेल
काही महिला स्वयंपाकघरात वापरलेले भाजीचे तेल फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामुळे ते घट्ट होते आणि गोठते. म्हणून तेल कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये.
9. लिंबू
लिंबू आणि संत्रा सारख्या साइट्रिक ऍसिडयुक्त फळे फ्रीजची शीतलता सहन करू शकत नाहीत. त्यांच्या सालीवर डाग येण्यास सुरवात होते आणि स्वादही बदलतो. फ्रीजमध्ये ठेवल्यावर या फळांचा रस सुकण्यास सुरवात होते.
10. कांदा
कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे फ्रीजमध्ये तसेच इतर पदार्थ बिघडण्याबरोबरच दुर्गंधीही येते. कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्वरीत खराब होतो.