भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगातील एक महान फलंदाज विराट कोहली याने भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ माजणे साहजिकच होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला तीन कसोटी सामन्यापैकी दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने ही मालिकाही गमवावी लागली.
तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर लगेच दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने आपण कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट इतिहासातील एका महान कर्णधाराच्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या सहा ते सात वर्षांच्या कालावधीमध्ये क्रिकेटमधील सर्व प्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्वच प्रकारचे नेतृत्व सोडून दिले असल्याने आता भारतीय क्रिकेटला कसोटी क्रिकेटसाठी नव्या नेतृत्वाचा शोध घ्यावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने टी-ट्वेंटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले होते त्यानंतर बीसीसीआयने अचानकच त्याच्या एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले आणि आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडून बीसीसीआयला धक्का दिला आहे. काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे आणि त्याला राजकारणाचाही वास येत आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू होती. जेव्हा रोहीत शर्माकडे झटपट क्रिकेटचे नेतृत्व देण्यात आले तेव्हा या प्रकारच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले होते.
आता कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपदही सोडले असल्याने भारताला नवीन कसोटी कर्णधार शोधावा लागणार आहे आणि बीसीसीआयसाठी तो एक कसोटीचा निर्णय असणार आहे. आतापर्यंत विराटच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य राहणे याचे संघातील स्थान निश्चित राहिलेले नाही. दुसरीकडे याच दक्षिण आफ्रिकेचा दौऱ्यावर एका कसोटीचे नेतृत्व केएल राहुलने केले होते; पण त्या कसोटीमध्येही भारताला पराभव पत्करावा लागला होता.
सध्याच्या कसोटी संघातील खेळाडूंवर नजर टाकली तर बहुतेकांची कारकीर्द आता संपुष्टात येण्याच्या बेतात आहे. त्यामुळे अशा कोणत्याही खेळाडूच्या हातात कसोटी कर्णधारपद दिले जाईल, असे सध्या तरी वाटत नाही. हा विचार करूनच जर एखाद्या नवोदित आणि तरुण खेळाडूच्या हातातच कर्णधारपदाची कमान दिली तर आश्चर्य वाटायला नको. कसोटी क्रिकेट संघातील सध्याचे खेळाडू अजिंक्य राहणे, चेतेश्वर पुजारा, अश्विन, महंमद शमी, इशांत शर्मा यापैकी कोणाला केवळ अनुभवाच्या जोरावर कर्णधारपद मिळेल अशी कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही.
मुळात भारतीय क्रिकेट संघ गेल्या वर्षीपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एक नंबर वर होता. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम सामना झाला होता; पण आजची स्थिती बघितली तर या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा क्रमांक पाचवा झाला आहे. कसोटी कर्णधार म्हणून विराटची कामगिरी निश्चितच वाखाणण्यासारखी होती हे कोणीही नाकारणार नाही. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सौरभ गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूंची सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणना केली जाते.
त्यामध्ये विराटचे नाव वर आहे. त्याच्या विजयाची टक्केवारी जवळपास साठ टक्क्यांच्या आसपास आहे. मुख्य म्हणजे कर्णधार म्हणून कामगिरी करत असताना विराटच्या वैयक्तिक कामगिरीवरही फारसा फरक पडला नव्हता. गेल्या दोन वर्षांत त्याच्या बॅटमधून फक्त शतक झळकले नाही अन्यथा त्याच्या कारकिर्दीमध्ये सातत्य कायम राहिले आहे. साहजिकच आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाचे ओझे खांद्यावरून उतरल्यानंतर विराटच्या फलंदाजीला निश्चितच बहर येईल, असे मानायला हरकत नाही.क्रिकेट संघाच्या सुदैवाने सध्या संघाचा कोच म्हणून राहुल द्रविडसारखा एक ज्येष्ठ खेळाडू उपस्थित आहे.
नवोदित खेळाडूंना घडविण्याचे कसब असणाऱ्या राहुल द्रविडला कर्णधार म्हणून कोणीही खेळाडू दिला तरी तो त्याच्याकडून योग्य कामगिरी करून घेईल याबाबत शंका घेण्याचेही कारण नाही. पण निश्चितच विराट कोहलीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे, ज्या क्रिकेट प्रकारांमध्ये भारताचा दबदबा होता तो दबदबा कायम ठेवण्याचे आव्हान आता बीसीसीआयला पेलावे लागणार आहे. एकीकडे आता विराट कोहली जरी संपूर्णपणे दडपणमुक्त वातावरणात खेळणार असला तरी दुसरीकडे बीसीसीआयवर मात्र योग्य खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती करण्याचे दडपण असणार आहे. मुळात आताचा जो भारतीय कसोटी क्रिकेट संघ आहे त्यामध्ये पुनर्रचना करण्यात भरपूर वाव आहे.
अनेक तरुण खेळाडू या कसोटी संघात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. राहणे आणि चेतेश्वर पुजारा या सारख्या मधल्या फळीतील फलंदाजांची कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे त्यांची जागा लवकरच नवीन खेळाडू घेतील अशीही शक्यता आहे. त्यामुळे नव्याने पुनर्रचित होणाऱ्या संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या एखाद्या चांगल्या खेळाडूच्या हातातच कसोटी संघाचे कर्णधारपद देण्याची गरज आहे. सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी भारतीय क्रिकेट संघाला जिंकण्याची सवय लावली होती आणि विराट कोहलीने आक्रमकपणे मैदानात उतरण्याची सवय भारतीय संघाला लावली होती.
आता एकाच वेळी ही जिंकण्याची सवय आणि आक्रमकपणा कायम ठेवण्याचे आव्हान बीसीसीआयला पेलावे लागणार आहे. हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या एखाद्या खेळाडूला ती जबाबदारी द्यावी लागणार आहे. भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात मोठा हातभार लावणाऱ्या विराट कोहलीला आयसीसी पुरस्कृत एकाही स्पर्धेत अजिंक्यपद मिळवता आले नाही हा एक नकारात्मक मुद्दा सोडल्यास विराट कोहलीची कारकीर्द निश्चितच लक्षात राहणारी आहे. विराटचा पुढचा वारसदार त्याच प्रकारचा असावा ही अपेक्षा.