दक्षिण आफ्रिका, हॉंगकॉंग आणि बोत्सवाना या देशांत करोना विषाणूचा नवा अवतार आढळला आहे. त्यावरून केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सावध केले आहे. नव्या करोना अवतारामुळे परिस्थिती चिंताजनक होत असल्यामुळे, त्याची परिणती शेअरबाजार कोसळण्यात झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाने युरोपातील वाढत्या संसर्गावरून नुकतेच चिंताजनक निवेदन जारी केले.
कोपनहेगन येथील आरोग्य संघटनेच्या कार्यालयाने म्हटले की, परिस्थिती अशीच राहिली तर आगामी तीन-चार महिन्यांत युरोपातील मृतांचा आकडा हा 7 लाखांपर्यंत जाऊ शकतो. आरोग्य संघटनेने हे मत 53 देशांतील स्थितीवरून मांडले आहे. करोना प्रोटोकॉलवरून युरोपातील नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याबद्दल संघटनेने खंत व्यक्त केली आहे. संवेदनशील भागात बुस्टर डोस देण्याची गरज संघटनेने बोलून दाखविली आहे.
रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांना बूस्टरची गरज असल्याचे मतही मांडले आहे. तसेच 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना तिसरा डोस देण्याची आवश्यकता असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. युरोपात गेल्या आठवड्यात दररोज 4200 पेक्षा अधिक मृत्यू नोंदले गेले. संपूर्ण युरोपात आतापर्यंत करोनाचे पंधरा लाखांहून अधिक बळी गेले आहेत.
25 देशांत बेड आणि 53 पैकी 49 देशांत आयसीयू बेडची गरज आतापासूनच पुढे चार महिने भासणार असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 1 मार्च 2022 पर्यंत युरोपात एकूण 20 लाख जणांचा मृत्यू करोनामुळे होईल, असे भाकित आरोग्य संघटनेने वर्तविले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, रशिया आणि युरोपात करोना रुग्णांचा आकडा फुगत आहे. करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जग पुन्हा चिंतेत पडले आहे.
विशेषत: युरोप हे करोना संसर्गाचे नवीन केंद्र बनले आहे. 60 ते 70 टक्के लसीकरण झालेल्या देशांतही करोनाचा फैलाव होत आहे. ऑस्ट्रियात करोना रोखण्यासाठी पुन्हा वीस दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. नेदरलॅंडची देखील हीच स्थिती आहे. जर्मनीत दररोज 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत आणि काही दिवसांतच ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशियातदेखील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही झोप उडवणारी आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपात करोनाचा डेल्टा संसर्ग पसरला आहे. हा अतिशय वेगाने पसरतो. सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांत करोना पसरण्यामागे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लशीचा प्रभाव कमी होणे आणि लस घेण्याबाबत पळ काढणे. विशेषत: पूर्व युरोपात लस घेण्याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जात आहे. या स्थितीमुळे भारताला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कारण यावर्षी सुरुवातीला युरोपात अशीच स्थिती होती आणि त्यानंतर भारतात दुसरी लाट आली. या लाटेने भारतात हाहाकार माजवला.
फायझरच्या लसीबाबत अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले की, दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे तिसरा बूस्टर डोस घेणे गरजेचे असून त्या आधारावर संसर्गापासून बचाव करणे शक्य राहू शकते. अशाच रितीने भारतात कोविशिल्ड लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील रोगप्रतिकारशक्तीच्या कालमर्यादेबाबत मत मांडले होते.
म्हणून याचा सारासार विचार करताना भारताने अमेरिका आणि युरोपातील वाढत्या संसर्गावर, प्रमाणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यानुसार आरोग्य मंत्रालयाला नियोजन करणे शक्य राहील. भारतात 18 पेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोविड लस देण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बूस्टर डोसबाबत शास्त्रज्ञ सांशक आहेत. बूस्टर डोसच्या चांगल्या परिणामाबाबत अद्यापपर्यंत कोणतेही विश्वासार्ह आकडे मिळालेले नाहीत, असे शास्त्रज्ञ सांगतात.
एकुणात बूस्टर डोसची योजना गोंधळात अडकली आहे. सध्या हिवाळा असून यात संसर्गाचे विषाणू आणखीच शक्तिशाली होतात. फ्लूसारख्या संसर्गाचा धोका हा नेहमीच राहिला आहे. भारतात सध्या पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध आहेत. परंतु नागरिक डोस घेण्याबाबत गंभीर नाहीत. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि ही बाब गंभीर आहे. यासंदर्भात सरकारने वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे. कारण दोन्ही डोसबाबत समाधानकारक आकडे आल्यानंतरच मुलांना आणि बूस्टर डोस देण्याबाबत सरकारला पावले टाकता येतील.
दुसरीकडे करोना संसर्गात घट झाल्यानंतर राज्यात वेगाने निर्बंध कमी गेले आहेत. सार्वजनिक ठिकाणं खुली केली असून यासाठी सध्या कोणतेही प्रमाणपत्र मागितले जात नसल्याचे चित्र आहे. पर्यटनस्थळं, धार्मिकस्थळं खुली केली असून तेथे ओसंडून गर्दी वाहत आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही. मिझोरामसारख्या अनेक राज्यांत संसर्गाचा दर अधिक आहे. त्यामुळे देशातील करोनाची चिंता कायम आहे.
लस न घेतलेली मंडळी किंवा सात महिन्यांपूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संसर्गावरून अधिक सजग राहण्याची गरज आहे. करोना संसर्गाची देशातील आणि परदेशातील स्थिती पाहता सरकारने आणखी चार ते पाच महिने निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. या आधारावर करोनावर नियंत्रण मिळवणे शक्य राहू शकते. तिसऱ्या लाटेला आपण निष्प्रभ करू शकतो. अर्थात, ही जबाबदारी आपल्यावरच आहे.