इंदोरी – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात धुळवडीच्या सणाला गालबोट लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धुलीवंदन खेळून झाल्यावर हातपाय धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.
जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय 21, रा. तारखेड, पाचोरा जि. जळगाव) नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतिय वर्षात शिकत होता. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास 7 ते 8 विद्यार्थी धुलीवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धुवत असताना जयदीप पाटील याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी, पोलीस अंमलदार युवराज वाघमारे, सचिन कचोळे, शिवाजी बांगर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे त्यांची टीम दाखल झाली. बोटीच्या साहाय्याने बुडालेल्या विद्यार्थ्याचा दोन तास शोध घेऊन मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढला.
तलावात सापडली 2.57 कोटींच्या किमतीची सोन्याची 40 बिस्कीटं! समोर आली धक्कादायक माहिती….
याबाबत बोलाना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत म्हणाले की, इंद्रायणी नदीपात्रात विद्यार्थी आंघोळ किंवा पोहण्यासाठी येतात. नदीपात्राला तीव्र उतार असल्याने पाय घसरून बुडाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कुंडमळा इंदोरी येथे दरवर्षी नदीपात्रात 15 ते 20 मृतदेह मिळतात. तरुणाई ने स्वतः आवर घातला तर अश्या घटना टाळता येतील.