पुणे – “स्थूलता’ याकडे केवळ “चेष्टा-मस्करी’ या अर्थाने पाहण्यापेक्षा गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली असून, अशा व्यक्तींना करोनाची लागण लगेच होऊन त्यांचा मृत्युचा धोका सर्वाधिक असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळेच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात ज्या 20 आजारांची यादी देण्यात आली आहे, त्यामध्ये “स्थूलता’ हा आजार असलेल्या लोकांचा समावेश “को-मॉर्बिड’अर्थात सहव्याधी रुग्णांमध्ये करावा, अशी मागणी केली जात आहे.
ब्रिटनमध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात 17 हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त होता, त्यांचा करोनाने मृत्यू होण्याचा धोका 33 पटींनी वाढला होता. करोनाने गंभीर असलेल्या व्यक्तींपैकी 34% रुग्णांचे वजन जास्त होते, तर 31% लोक लठ्ठ आणि 7% अतिलठ्ठ होते.
स्थूल असणाऱ्या व्यक्तीला हृदयविकार किंवा मधुमेह होण्याचा धोका अनेकपटींनी वाढतो. 2016 साली “लॅन्सेट’ या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार सर्वाधिक लठ्ठ लोकांची संख्येत भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. जगातल्या लठ्ठ पुरुषांपैकी 3.7% पुरुष भारतात आहेत; तर लठ्ठ महिलांपैकी 5.3% महिला भारतात आहेत.
जगातला लठ्ठपणाचा दर पाहता 25 पेक्षा जास्त “बॉडी मास इंडेक्स’ असणाऱ्या लोकांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असेल, असे “वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन’चे म्हणणे आहे.
अनेक केसेसमध्ये करोनाचा फुफ्फुसावर परिणाम होतो, त्यामुळे दम लागतो. अशावेळी प्रकृती गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. सरकारने आता “ओबेसिटी’ या आजाराला आता विम्याचे कवचही दिले आहे. त्यामुळे साहजिकच करोना लसीकरणामध्ये प्राधान्याने स्थूल व्यक्तींचा समावेश करणे आवश्यक आहे.
– डॉ. शशांक शहा, बॅंरियाट्रिक सर्जन