रायपूर : छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. या चकमकीवेळी, एका जवानाला नक्षलवाद्यांनी ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. या जवानाबाबत आता नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला फोन करून माहिती दिली आहे.
I received two calls from Naxals that one jawan is in their custody. They said the jawan received bullet injury&was given medical treatment,& he’ll be released in 2 days. They said a video&photo of jawan to be released soon: Ganesh Mishra, a journalist from Bijapur, Chhattisgarh pic.twitter.com/2lXRNnfggX
— ANI (@ANI) April 7, 2021
वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बिजापूरमधील पत्रकार गणेश मिश्रा यांना या चमकमकीनंतर दोन वेळा फोन आल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत सविस्तर सांगितले की, नक्षलवाद्यांचा मला दोनवेळा फोन आला आहे. त्यांनी मला फोनवर एक जवान आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आहे. या जवानाला गोळी लागल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. त्याची दोन दिवसांत सुटका केली जाईल. या जवानाचे फोटो आणि व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध केले जातील.’ असं ही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, हिडमा टेकुलगुडा आणि जुनागुडा गावाच्या जवळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. नक्षलींच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर त्या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एकत्रित मोहीम राबवून हिडमाला जेरबंद करण्याची योजना आखली होती. त्यासाठीच सीआरपीएफ, बीजपुर पोलिसांचे डीआरजी युनिट तसेच एसटीएफचे शेकडो जवान बीजपुर आणि सुकमा जिल्ह्यातून टेकुलगुडा आणि जुनागुडा च्या दिशेने निघाले होते.
शनिवारी दुपारी एक वाजायच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी जुनगुडा गावाजवळ सुरक्षा दलांवर पहिला हल्ला केला. तिथे नक्षलींनी यू आकाराची रचना करत सुरक्षा दलांना घेरले आणि जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्याना घेऊन पोलीस पार्टी पुढे जात असताना टेकुलगुडा येथे दुसरा हल्ला करण्यात आला.
टेकुलगुडा या ठिकाणी करण्यात आलेला हा हल्ला जास्त भीषण होता. अनेक तास दोन्ही बाजूनी गोळीबार झाला आणि त्यात सुरक्षा दलांचे सर्वाधिक नुकसान झाले. माहिती अशी आहे की या ठिकाणी, चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच स्वतः हिडमा उपस्थित होता. हल्ल्याच्या शेवटी तो 40 नक्षलीसोबत चकमकीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने टेकुलगुडा गावाच्या अंगणात अनेक पोलिसांची हत्या केली.
आताच्या घडीला हिडमा हा सर्वात कुख्यात आणि क्रूरकर्मा नक्षली कमांडर समजला जातोय. त्याने बिजापूर सारखेच अनेक मोठे हल्ले पोलिसांवर घडविले आहे. तो गनिमी काव्याच्या हल्ल्याची योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात चाणाक्ष मानला जातो. त्यामुळेच त्याच्याकडे नक्षलींच्या मिलिटरी युनिटच्या कमांडर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.