पिंपरी -समाजात चुकीचे काम करणाऱ्यांच्या विरोधात मी कारवाई करतो. त्यामुळे ऍक्शला रिऍक्शन येणारच आहे. मी केलेल्या कारवाईमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले त्यांनी माझ्याविरोधात कट रचण्याचा प्रयत्न होता, मात्र सर्वसामान्यांच्या हितासाठी जे करणे आवश्यक होते तेच मी वर्षभरात केले, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दै. प्रभातला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.
दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आरतीसाठी आलेल्या पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी डिजीटल प्रभातला दिलेल्या मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.
राजकीय नेते किंवा व्हॉइट कॉलर गुन्हेगारांवर कारवाई केली म्हणून बदल्या होतात. मात्र मला कधीच बदलीची भिती वाटत नाही. कारण कोणत्याही पदाची लालसा मला नाही. नागरिकांची कामे करण्यास मी प्राधान्य देतो. त्यामुळे बदली झाली तरी मला त्याची पर्वा नाही. आपल्यावर टीका होत नाही किंवा आपल्या विरोधात कट होत नाही तोपर्यंत आपण चांगले काम करतो असे मानू नये. तुम्ही जर ऍक्शन घेतली तर त्याची चुकीचे काम करणाऱ्यांमधून रिऍक्शन
येतच असते.
आयुक्त पुढे म्हणाले, मी माझे टार्गेट स्वतःच निश्चित करतो. मी जिथे काम करतो तिथे कायद्याचे शासन असले पाहिजे. तेथील नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण असले पाहिजे, यासाठी मी नेहमीच कार्यरत राहतो. कायद्याचे राज्य आणि भयमुक्त वातावरण हाच लोकशाहीचा हा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षभरात सामाजिक सुरक्षा पथकाने 395 ठिकाणी छापे घातल्याचेही कृष्ण प्रकाश म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी माझे दरवाजे खुले
माझी दारे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली असून मी माझा मोबाइल क्रमांकही नागरिकांसाठी जाहीर केला आहे. मला भेटणाऱ्यांमध्ये अनेकजण स्वतः दोषी असूनही ते तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी भेटतात.
मला भेटणाऱ्यांपैकी 99 टक्के लोक पीडित असतात. उर्वरित एक टक्क्यांमध्ये काही लोक वारंवार असे मुद्दे घेऊन येतात की ज्यामध्ये काही दम नसतो. तर काही लोक असेही असतात की ज्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून स्वतःचा कार्यभाग साधायचा असतो. अशा प्रकरणांमध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या कार्यवाहीबाबत आदेश देतो.