पारनेर – स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी, टीम आडवाटेचं पारनेर आणि नागेश्वर मित्र मंडळ यांच्या सहयोगातून पद्मभूषण अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक शनिवार दि. 28 जानेवारी रोजी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे होणार असल्याची माहिती संयोजन समिती प्रमुख संजय पठाडे, प्रा.तुषार ठुबे, अशोक गायकवाड, विनोद गोळे यांनी दिली.
महाविद्यालयीन, आठवी ते बारावी आणि पाचवी ते सातवी अशा तीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तिन्ही गटांमधून प्रथम ते चतुर्थ अशा प्रत्येकी चार विजेत्यांसाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रासह पाच हजारांपासून एक हजारापर्यंत पारितोषिके घोषित करण्यात आलेली आहेत.
महाविद्यालयीन गट राज्यस्तरीय असून स्पर्धकांसाठी25 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. स्पर्धेसाठी नवीन शैक्षणिक धोरण, माहितीचा अधिकार एक क्रांतिकारक पाऊल, आता नको यंत्र संवाद, हवायं हृदय संवाद, आदर्श गाव माझी संकल्पना, संविधान आणि आम्ही, अण्णा हजारे यांचे जीवन कार्य हे विषय आहेत.
आठवी ते बारावी हा गट नगर जिल्हा आणि शिरूर तालुक्यातील विद्यालयांसाठी आहे. यात आधी लगीन कोंढण्याचे ते आजचे तानाजी, युवा शक्ती हीच राष्ट्र शक्ती, सोशल मीडिया शाप की वरदान, महिलांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान, अण्णा हजारे यांचे जीवन कार्य हे विषय आहेत. पाचवी ते सातवी हा गट पारनेर तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यात माझा बाप शेतकरी, वृक्ष संवर्धन काळाची गरज, माझ्या स्वप्नातील भारत, अण्णा हजारे यांचे जीवन कार्य हे विषय आहेत. एका गटात एका शाळा किंवा महाविद्यालयाचे जास्तीत-जास्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
ग्रामीण भागातील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठाचा आत्मविश्वास निर्माण होऊन, त्यातून या मातीतून भविष्यात महाराष्ट्र गाजवणारे वक्ते तयार व्हावेत, या उद्देशाने हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले असल्याचे प्रा.तुषार ठुबे यांनी सांगितले.